का करायचे नाही जपानच्या पोरींना लग्न?
#टोकियो
जपान सरकार सध्या घटत्या लोकसंख्येमुळे चिंताग्रस्त बनले आहे. एका तर या देशाची लोकसंख्या कमी त्यात जन्मदराचे प्रमाणही घेतले आहे. कारण या देशातील तरुणांना लग्न करायचे नसते. त्यातही तरुणींमध्ये लग्न न करण्याची मानसिकता वाढीस लागली आहे. जपान सरकारच्या ताज्या अहवालानुसार, ३०
वर्ष वयोगटातील २६ टक्के मुलींना आणि २० वर्ष वयोगटातील १४ टक्के मुलींना लग्नच करायचे नसल्याचे स्पष्ट झाले आहे. आता लग्नच होणार नसतील, तर जन्मदर कसा सुधारणार?
जोडीदारांच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात. यावर विश्वास ठेऊन समाजाने विवाह संस्था निर्माण केली. वयाचा एक विशिष्ट टप्पा ओलांडला की मुला-मुलींच्या लग्नाची तयारी केली जाते. काही वेळा प्रेम तर काही वेळा घरच्यांच्या पसंतीने लग्न ठरते. नवे जोडपेही ही परंपरा सांभाळत मोठ्यांच्या आशिर्वादाने एकत्र आयुष्य जगतात. मात्र हे सगळे जपानमध्ये ठप्प झाले आहे. जपान सरकारच्या या अहवालात या मुलींना लग्न का करायचे नाही, याचाही अभ्यास करण्यात आला आहे.
सध्या जगभरातच सिंगल अर्थात एकट्याने आयुष्य जगायचा विचार प्रभावी ठरतो आहे. मात्र जपानमध्ये हा विचार सरकारच्या चिंतेत भर घालतो आहे. लग्न झाले की महिलेला एक घर सोडून दुसरीकडे यावे लागते. दुसरे घर, माणसं सांभाळावी लागतात. त्यांच्यावर नैतिक जबाबदारी येते. हा बदल अवघड वाटणारा असला तरीही अशक्य नक्कीच नसतो. पण, तरीही काही स्त्रीयांना हा बदल नकोसा वाटतो. त्यामुळे त्या महिला या सगळ्यापासून दूर राहतात. सिंगल राहण्याचा निर्णय घेतात. लग्नानंतर घर आणि नोकरी दोन्ही सांभाळणे खूप कठीण होऊन बसते. तसेच, घरातली कामे, जबाबदाऱ्या यामुळे स्वत:चे आयुष्य जगता येत नाही. त्यामुळेच जपानमधील मुलींना लग्न नकोसे झाले आहे. केवळ जपानमधील नाही तर अर्ध्या कॅनेडियन लोकांना वाटते की लग्नाची काही आवश्यकता नाही. यासोबतच चिनी महिलांनाही लग्न फारसे आवडत नाही. म्हणून त्या करत नाहीत किंवा उशिरा लग्न करतात.वृत्तसंस्था