पैसे नाहीत मग निवडणूक कशी घ्यायची?
#इस्लामाबाद
पाकिस्तान सध्या भुकेकंगाल खायला आहे. जगभरातील मित्र देशांनी मदत करायला नकार दिल्याने जागतिक राजकारणात पाकिस्तानचे हसे झाले आहे, हे आपण ऐकून आहोत. मात्र पाकिस्तान सरकारकडे पंजाब प्रांताच्या निवडणुका घ्यायला पैसे नसल्याने सरकार आणि न्यायपालिकेत वाद सुरु झाले आहेत. पाकिस्तानमधील पंजाब राज्याच्या निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. याचा राग मनात धरत पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या सरकारने सरन्यायाधिशांचा राजीनामा मागितला आहे.
न्यायालयाने पंजाब प्रांताच्या निवडणूक १४ मे रोजी घेण्याचे आदेश बजावले आहेत. तशी तयारी करण्याच्या सूचना निवडणूक आयोगाकडे देण्यात आल्या आहेत. मात्र सरकारकडे निवडणुका घेण्यासाठी पुरेसे पैसे नाहीत. त्यामुळे सरकार न्यायालयाचे आदेश पाळायला तयार नाही. सरकारच्यामते आमची ही अडचण लक्षात घेऊन निवडणूक आयोग आणि न्यायालयाने निवडणूक लांबणीवर ढकलावी.
सुरक्षित वातावरणातच घ्याव्यात निवडणुका
पंतप्रधान शाहबाज शरीफ सध्या आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे कर्ज मागून थकले आहेत. नाणेनिधीने केवळ आश्वासने देऊन पाकिस्तानची बोळवण केली आहे. त्यामुळे आता पंजाबची निवडणूक घ्यायची तर निवडणूक आयोगाला पैसे उपलब्ध करून द्यावे लागणार. पैसे तर सरकारकडे नाहीत. कारण मागच्या एक वर्षांपासून सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारी थकलेल्या आहेत.लोकांना गव्हाचे पीठ द्यायलाही पैसे नाहीत. त्यात इम्रान खान यांचे आंदोलन सुरु आहे. त्यामुळे पंतप्रधान शरीफ यांनी सध्या देशातील , पंजाबमधील वातावरण चांगले नाही, त्यामुळे निवडणुका पुढे ढकलाव्यात. सुरक्षित वातावरणातच निवडणुका घेण्यात यावे, असे कारण पुढे केले आहे. याशिवाय वेळेवर निवडणुक पुढे ढकलण्याची मागणी फेटाळून लावल्याने शरीफ यांचे सरकार न्यायपालिकेवरच भडकले आहे. शरीफ यांच्या सरकारमधील सूचना आणि माहिती प्रसारण मंत्री मरियम औरंगजेब यांनी सरन्यायाधीश आता वादग्रस्त बनले आहेत, त्यांनी पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे.
वृत्तसंस्था