अंबानी-अदानी
#दाव्होस
भारतातील अतिश्रीमंत आणखी मालामाल होत असताना गरीब मात्र आणखी कंगाल होत आहेत. देशातील ४० टक्के संपत्ती केवळ १ टक्का श्रीमंतांकडे आहे. याचवेळी तळातील ५० टक्के जनतेकडे देशातील एकूण संपत्तीपैकी केवळ ३ टक्के संपत्ती आहे.
जागतिक आर्थिक परिषदेच्या बैठकीत 'ऑक्सफॅम'ने मांडलेल्या अहवालातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे. या अहवालानुसार, भारतातील दहा अतिश्रीमंतांवर पाच टक्के कर आकारल्यास देशातील सर्व मुलांच्या शालेय शिक्षणाचा खर्च भरून निघेल. अब्जाधीश उद्योगपती गौतम अदानी यांनी २०१७ ते २०२१ या कालावधीत मिळवलेल्या नफ्यावर कर लावल्यास १.७ लाख कोटी रुपये मिळतील. या पैशातून भारतात दरवर्षी ५० लाखांहून अधिक प्राथमिक शिक्षकांची भरती केली जाऊ शकते.
भारतातील अब्जाधीशांवर त्यांच्या संपत्तीच्या तुलनेत केवळ २ टक्के कर आकारला तरी त्यातून ४० हजार ४२३ कोटी रुपये मिळतील. या पैशातून देशातील कुपोषित मुलांना पुढील तीन वर्षे पोषण आहार पुरवता येऊ शकतो. देशातील आघाडीच्या दहा अब्जाधीशांवर ५ टक्के कर आकारल्यास त्यातून १.३७ लाख कोटी रुपये मिळतील. केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाला वर्षाला मिळणाऱ्या निधीच्या तुलनेत हे प्रमाण दीडपट आहे. चालू आर्थिक वर्षात आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाला ८६ हजार २०० कोटी रुपये तर आयुष मंत्रालयाला ३ हजार ५० कोटी रुपये मिळाले, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
आयएएनएस