राजकोटमध्ये फिरकीचा आखाडा?
भारत-इंग्लंड यांच्यात राजकोट येथे होणाऱ्या मालिकेतील तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यासाठी फिरकी गोलंदाजीला मदत करणारी खेळपट्टी ठेवण्यात येणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.
पाच सामन्यांच्या या मालिकेत दोन सामन्यांनंतर दोन्ही संघ १-१ ने बरोबरीत आहेत. तिसरी कसोटी जिंकण्यासाठी बीसीसीआयने नेहमीचे फिरकीअस्त्र वापर करण्याची व्यूहरचना आखली आहे. त्यानुसार, राजकोटची खेळपट्टी फिरकीला अधिक मदत करणारी ठेवण्यासाठी क्युरेटरला निर्देश देण्यात आल्याचे कळते. रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा या फिरकी जोडीच्या तालावर पाहुण्या साहेबांच्या संघाला नाचवून मालिकेत २-१ अशी आघाडी घेण्याचे इरादे बीसीसीआयचे आहेत.
राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट स्टेडियमवर येत्या गुरुवारपासून (दि. १५) सुरू होणार आहे. दोन्ही संघांसाठी हा कसोटी सामना अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. ही लढत जिंकून मालिकेत आघाडी घेण्यासाठी दोन्ही संघ प्रयत्नशील असतील. अशातच राजकोटमधील सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमच्या खेळपट्टीबाबत मोठी माहिती समोर आली आहे. पिच क्युरेटरला ही खेळपट्टी फिरकीला जास्त मदत करणारी ठरेल, अशा पद्धतीने तयार करण्याच्या सूचना बीसीसीआयने दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.
राजकोटमध्ये सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन बुधवारी (दि. १४) रवींद्र जडेजा आणि चेतेश्वर पुजारा यांना भारतीय क्रिकेटमधील योगदानाबद्दल सन्मानित करणार आहे. याच कार्यक्रमात राजकोटच्या स्टेडियमचे नामकरण अनुभवी प्रशासक निरंजन शहा यांच्या नावावर करण्यात येणार आहे.
ज्या राजकोट येथे ही लढत होणार आहे तेथे भारताचा दिग्गज फिरकीपटू रविचंद्रन अश्विनची कामगिरी नेहमीच शानदार राहिली आहे. त्यामुळे इंग्लंडच्या संघाचे टेन्शन नक्कीच वाढले असेल. राजकोटच्या मैदानावर अश्विन अण्णाविरुद्ध खेळणे इंग्लंडसाठी सोपी गोष्ट नक्कीच नसेल.
भारतीय क्रिकेट संघ राजकोटच्या मैदानावर आतापर्यंत दोन कसोटी सामने खेळला आहे. त्यापैकी २०१६ मध्ये इंग्लंडविरुद्ध झालेली पहिली कसोटी ड्रॉ झाली होती. दुसरी कसोटी २०१८ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध झाली होती. त्यात भारताने एक डाव आणि २७२ धावांनी मोठा विजय मिळवला होता.