भेटता कसले, हिंमत असेल तर राजीनामाच द्या; जितेंद्र आव्हाडांचे उपमुख्यमंत्री अजित पवारांना ओपन चॅलेंज
मुंबई : देशात सध्या नीट परीक्षा घोटाळ्याचा मुद्दा गाजत आहे. लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी निगडित हा विषय आहे. घोटाळ्यामागच्या सूत्रधारांना शोधून काढण्यासाठी तपास यंत्रणाकडून वेगवान हालचाली सुरू आहेत. काही संशयित आरोपींना अटक झाली आहे. याच नीट परीक्षेच्या मुद्यावरून शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड आक्रमक झाले आहेत. अजित पवारांनी विद्यार्थ्यांच्या पालकांना भेटण्यापेक्षा हिंमत असेल तर थेट राजीनामाच द्यावा, असे आव्हान आव्हाडांनी दिले आहे.
शिक्षणाची एवढी वाईट अवस्था मागच्या ७५ वर्षांच्या इतिहासात कधीच झाली नव्हती. एमबीबीएस सारख्या परीक्षेत गुणवत्ता तपासणार नसाल, केवळ वशिल्यावर घेणार असाल, तर या देशाचे भविष्य अंधारात आहे, असे आव्हाड म्हणाले. एका परीक्षेत संपूर्ण घर सहभागी होते. बहीण, भाऊ, नातेवाईक, आई-वडील सगळेच इन्व्हॉल्व्ह असतात. आई मुलांसाठी सगळे काही करते, जरा तिचा विचार करा. आईच्या डोळ्यात किती अश्रू असतील, मुलं डिप्रेशनमध्ये असतील. या नालायक सरकारला त्याचे काही देणे-घेणे नाही. अजित पवारांनी पत्रकार परिषद घेतली. मुंबई-पुण्यातील नीटच्या विद्यार्थ्यांची भेट घेणार आहे, असे ते म्हणाले. भेट कसली घेता? तुम्ही त्या सरकारमध्ये सहभागी आहात. तुमच्या मित्र पक्षांचे मंत्री आहेत. केंद्रातील मंत्र्याचा राजीनामा मागा, नाहीतर तुम्ही राजीनामा द्या, अशी मागणी जितेंद्र आव्हाड यांनी केली. पालकांना नुसते भेटता कसले, हिंमत असेल तर राजीनामा द्या. वरच्या सरकारला वठणीवर आणा. हेच एमबीबीएसचे विद्यार्थी पुढे जाऊन गायनॅक, न्यूरो सर्जन बनणार. तुमचं शरीर त्यांच्या हातात देणार. ते काय काम करणार? ५-१० कोटी रुपये देऊन अशिक्षित माणूस डॉक्टर बनणार. तुमच्या पोटाऐवजी छातीचं ऑपरेशन करणार. मस्करी लावलीय का? तुम्ही जनतेसोबत खेळत आहात. हे डॉक्टर पुढे जाऊन काय काम करणार? असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी विचारला.
‘हा तुमच्या घरचा विषय आहे का?’
विद्यार्थ्यांचे वर्ष वाया गेले. या वर्षाचे काही महत्त्व आहे की नाही. वय वाढते. मेहनतीचे काय करणार?. सरकारने प्रायश्चित्त घेतले पाहिजे. सरकारने सत्य सांगितले पाहिजे. मोठ्या महत्त्वाच्या परीक्षेची जबाबदारी प्रायव्हेट एजन्सीला कशी देता? हा तुमच्या घरचा विषय आहे का? असे प्रश्न जितेंद्र आव्हाड यांनी विचारले आहेत.