विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरु आहे. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजपा आमदार प्रसाद लाड यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केली. तसेच शिवीगाळ केली. असा आरोप भारतीय जनता पार्टीने केला आहे. त्यानंतर अंबादास दानवे यांचं पाच दिवसांसाठी निलंबन करण्यात आलं आहे.
सोमवारी (१ जुलै) विधानपरिषदेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार आमने-सामने आले होते. यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलेल्या वक्तव्यावर भाजपा आमदार आक्रमक झाले होते. दानवे यांच्या राजीनाम्याची मागणीही केली गेली. त्यानंतर आमदार प्रसाद लाड यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं होतं. विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांना काही काळ कामकाज स्थगित करावं लागलं.
कामकाज सुरू झाल्यावर भाजपाचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अंबादास दानवे यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी यासंदर्भात ठराव मांडला. त्यानंतर उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी दानवे यांचं पाच दिवसांसाठी निलंबन केलं आहे. तसेच निलंबनाच्या कालावधीत दानवे यांना सभागृहात येण्यास बंदी असेल असंही सांगितलं.