‘नव्या संसद भवनाचे उद्घाटन राष्ट्रपती मुर्मू यांच्या हस्ते व्हावे’
#नवी दिल्ली
नवीन संसद भवन इमारतीचे उद्घाटन २८ मे रोजी म्हणजे रविवारी विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या नव्या वास्तूचे उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते व्हावे अशी मागणी काँग्रेस पक्षाने केली आहे. अशी मागणी अन्य काही विरोधी नेत्यांनीही केली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणाऱ्या उद्घाटनावर बहिष्कार घालण्याचा निर्णय विरोधी पक्ष घेण्याच्या विचारात आहेत.
विशेष म्हणजे संसदेच्या इमारतीचे भूमिपूजनही मोदी यांच्या हस्तेच झाले होते. भूमिपूजनाच्या कार्यक्रमावर सर्व विरोधकांनी बहिष्कार टाकला होता. त्या वेळी देशात शेतकरी आंदोलन सुरू होते. तसेच कोरोनामुळे अर्थव्यवस्था खालावलेली असतानाही नवे संसद भवन
बांधण्याची घाई का, असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला होता.
अनेक विरोधी पक्षांनी पंतप्रधान स्वतःच उद्घाटन करत असल्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या वास्तूचे उद्घाटन व्हावे, अशीही अनेकांनी मागणी केली आहे. काँग्रेस पक्षातील सूत्रांनी सांगितले की, विरोधी पक्षांनी या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहावे की नाही? याबाबत सर्व विरोधी पक्ष एकत्र येऊन निर्णय घेतील.
नवीन संसद इमारतीचे उद्घाटन सावरकर जयंतीनिमित्त होणार असल्याचे समजल्यावर काँग्रेसने आपली भूमिका आणखी ताठर केली आहे.
रविवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नवीन संसद भवनचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याऐवजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते व्हावे, अशी मागणी केली होती. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनीदेखील ट्वीट करत यावर टीका केली. सावरकरांच्या जयंतीदिनी संसदेचे उद्घाटन होणे हा राष्ट्रपिता, राष्ट्रमातांचा अवमान आहे. गांधी, नेहरू, पटेल, बोस यांना नाकारण्याचा हा प्रयत्न आहे. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनाही अव्हेरले असल्याचे रमेश म्हणाले.
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी हा विषय दलित आणि आदिवासी यांच्याशी जोडला. “केंद्र सरकार दलित आणि आदिवासींचा वापर हा निवडणुकीत राजकीय फायदा व्हावा, म्हणून करत आहे. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना संसद भवनाच्या इमारतीच्या भूमिपूजनाला आमंत्रित केले नव्हते. आता या वास्तूचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते उद्घाटन का केले जात नाही, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
संसद हे प्रजासत्ताक भारतातील सर्वोच्च कायदेमंडळ आहे. राष्ट्रपती हे घटनेतील सर्वोच्च पद. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या केंद्र सरकार, विरोधक आणि प्रत्येक भारतीय नागरिकाचे प्रतिनिधित्व करतात. त्या भारताच्या पहिल्या नागरिक आहेत. त्यांच्या हस्ते नव्या संसदेचे उद्घाटन करणे हे लोकशाहीचे तत्त्व आणि घटनात्मक मूल्यांप्रति सरकारची जबाबदारी आहे. मोदी सरकार वारंवार शिष्टाचाराचा भंग करीत आले आहे. भाजपा आणि आरएसएस सरकारच्या काळात राष्ट्रपती कार्यालयाची प्रतिष्ठा कमी करण्याचा प्रयत्न होत असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.
वृत्तसंस्था