संग्रहित छायाचित्र
लातूर : वैद्यकीय शिक्षण प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या ‘नीट’ परीक्षेत झालेल्या पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे महाराष्ट्रापर्यंत पोहोचले आहेत. या प्रकरणी राज्यातील दोन शिक्षकांना ताब्यात घेण्यात आले आहे.
नांदेडच्या दहशतवादविरोधी पथकाने ‘नीट’ पेपरफुटी प्रकरणी लातूरमधून दोन शिक्षकांना अटक केली आहे. बिहारमध्ये आतापर्यंत १३ लोकांना अटक केल्यानंतर राज्यातील दोघांना ताब्यात घेतल्यामुळे पेपरफुटी प्रकरणात महाराष्ट्राचे कनेक्शन आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. संजय तुकाराम जाधव आणि जलील उमरखाँ पठाण या दोन जिल्हा परिषद शिक्षकांना नांदेड एटीएसने ताब्यात घेतले आहे. यातील एक शिक्षक लातूरमध्ये तर दुसरा सोलापूरमध्ये कार्यरत आहे. ‘नीट’ पेपरफुटी प्रकरणी दोघांचीही कसून चौकशी केली जात आहे.
शनिवारी रात्री दोघांनाही लातूरमधून ताब्यात घेतल्यानंतर चौकशी करून त्यांना सोडण्यात आले. मात्र पुन्हा चौकशी करण्याची गरज भासल्यास बोलावले जाईल, अशी ताकीद त्यांना देण्यात आली आहे. विशेष म्हणजे दोन्ही शिक्षक लातूर जिल्ह्यात खासगी शिकवणी वर्ग चालवतात.
वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतलेल्या ‘नीट-यूजी’ २०२४ सामाईक प्रवेश परीक्षेच्या निकालावरून देशभर वादाचे लोण पसरले आहे. काही पालकांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये जनहित याचिकाही दाखल केली आहे. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स), केंद्रीय विद्यापीठांसह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच अभिमत विद्यापीठांमध्ये एमबीबीएस, बीडीएस आणि बीएस्सी नर्सिंग या प्रवेशासाठी ‘नीट’ची परीक्षा घेण्यात येते. यात देशभरातून सुमारे २४ लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी ५ लाख ४७ हजार ३६ विद्यार्थी आणि ७ लाख ६९ हजार २२२ विद्यार्थिनी प्रवेशासाठी पात्र ठरल्या आहेत.
यंदा पात्र ठरणाऱ्यांच्या संख्येत तब्बल दोन लाखांनी वाढ झाली आहे. त्यामुळे ‘पात्रता गुणां’मध्ये (कट ऑफ) प्रचंड वाढ झाली. उत्तीर्ण होणाऱ्यांची संख्या जास्त असल्याने अनेक विद्यार्थ्यांचे स्वप्न भंगले आहे.