संग्रहित छायाचित्र
मुंबई: बदलापूर लैंगिक अत्याचारप्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचे एन्काउंटर वादग्रस्त ठरले असून खुद्द मुंबई उच्च न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत. यामुळे या प्रकरणाचा संपूर्ण घटनाक्रमच संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. एवढेच नव्हे तर हे एन्काउंटर असूच शकत नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाने सुनावणीवेळी म्हटलं आहे. याप्रकरणी बुधवारी सुनावणी झाली असून आता पुढची सुनावणी येत्या गुरुवारी होणार आहे.
याप्रकरणी न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण आणि न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. बुधवारच्या सुनावणीत न्यायालयाने सरकारी वकिलांना विविध प्रश्न विचारले. न्यायालय म्हणते, पोलीस वाहनातून आरोपीला घेऊन जात असताना चार पोलीस अधिकाऱ्यांची गरज काय होती? यासाठी अतिरिक्त माणसांचा वापर झाला असे तुम्हाला वाटत नाही का? आरोपीने हातातून पिस्तुल खेचून घेतली तेव्हा चार पोलीस अधिकाऱ्यांनी त्याला रोखायला हवं होतं. चार पोलिसांना तो आवरता आला नाही का?, असाही प्रश्न न्यायालयाने विचारला. अक्षयने तीन गोळ्या झाडल्या, असं तुम्ही म्हणालात. एक गोळी पोलिसाला लागली, मग इतर दोन गोळ्या कुठे आहेत? आपण स्वसंरक्षणाकरता अशा परिस्थितीत पायावर किंवा हातावर गोळी झाडतो. गोळी कुठे मारावी याचं प्रशिक्षण पोलिसांना दिले जाते. अशाही प्रश्नांची सरबत्ती न्यायालयाने केली. त्यावर सरकारी वकिल म्हणाले की, पोलिसांनी विचार केला नाही, त्यांनी घटनेवर तत्काळ प्रतिक्रिया दिली.
न्यायमूर्ती म्हणतात, आरोपीने जेव्हा हातात पिस्तुल घेऊन रोखली तेव्हा इतर अधिकाऱ्यांनी त्याला रोखलं का नाही. तो फार स्ट्राँग, मजबत व्यक्ती नव्हता. त्यामुळे पोलिसांचे म्हणणे स्वीकारणे कठीण आहे. हे एन्काऊंटर असू शकत नाही. आरोपीने यापूर्वी कधी शस्त्र वापरले आहेत का? जर त्याने पिस्तुल लोड केली, असं तुम्ही म्हणत असाल तर त्याने याआधी शस्त्र वापरली असतील. न्यायमूर्तींच्या प्रश्नावर सरकारी वकील म्हणाले, त्याने पिस्तुल लोड केली नाही. झटापटीत पिस्तुल लोड झाली होती. त्याने याआधी कधीही शस्त्रे वापरली नाहीत. गंभीर गुन्हा असलेल्या माणसाला घेऊन जाताना एवढा निष्काळजीपणा का दाखवला. याबाबत नियमावली काय आहे? त्याच्या हाताला बेड्या होत्या का? असा प्रश्नही न्यायमूर्तींनी विचारला. त्यावर सरकारी वकील वेणेगावकर म्हणाले, त्याच्या हाताला बेड्या होत्या. पण त्याने पाणी मागितलं.
अक्षय शिंदेला तुरुंगातून बाहेर काढल्यानंतर त्याला पोलीस व्हॅनमध्ये बसवेपर्यंत आणि एन्काऊंटर झाल्यानंतर शिवाजी रुग्णालयात नेईपर्यंतच्या सर्व घटनाक्रमाचे व्हीडीओ फुटेज उच्च न्यायालयाने सदर करण्यास सांगितले आहेत. अक्षय शिंदेने पोलिसांच्या हातातील बंदूक हिसकावून घेऊन पोलिसांवर गोळीबार केला, असा दावा करण्यात येतो आहे. यावर न्यायमूर्तीं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, पोलिसांची पिस्तुल अक्षयने कशी हिसकावली. ती आधीच लोड कशी काय होती? यावर आमचा विश्वास बसत नाही. कोणताही सामान्य माणूस पिस्तुल हिसकावून गोळी झाडू शकत नाही. कोणताही कमजोर माणूस पिस्तुल लोड करू शकत नाही. तुम्हाला पिस्तुल वापरता येते का? मी १०० वेळा तरी वापरली आहे, त्यामुळे मी हे सांगू शकतो.
दोन गोळ्या कुठे गेल्या?
न्यायालय म्हणते, अक्षयने तीन गोळ्या झाडल्या असं तुम्ही म्हणालात. एक गोळी पोलिसाला लागली. मग इतर दोन गोळ्या कुठे आहेत? आपण स्वसंरक्षणाकरता अशी परिस्थितीत पायावर किंवा हातावर गोळी मारतो. गोळी कुठे मारावी याचं प्रशिक्षण पोलिसांना दिलं जातं. अशाही प्रश्नांची कोर्टाने सरबत्ती केली. त्यावर सरकारी वकिलांनी सांगितलं की, पोलिसांनी विचार केला नाही, त्यांनी घटनेवर तत्काळ प्रतिक्रिया दिली. त्याने जेव्हा हातात पिस्तुल घेऊन कोणावर रोखली तेव्हा इतर अधिकाऱ्यांनी त्याला रोखलं का नाही. तो फार स्ट्राँग माणूस नव्हता. त्यामुळे हे स्वीकारणं कठीण आहे. हे एन्काऊंटर असू शकत नाही.
जखमींचे अहवाल द्या
याप्रकरणातील जखमी पोलीस अधिकाऱ्याचे वैद्यकीय अहवालही कोर्टाने मागितले आहेत. तसेच, अक्षयने विशिष्ट अतंराने गोळीबार केला की पाँइट ब्लँक रेंज गोळीबार केला याचा फॉरेन्सिक अहवालही कोर्टाने मागवला आहे. तसेच, एका बाजूला गोळी लागून ती दुसऱ्या बाजूला कुठे गेली असा सवालही त्यांनी विचारला. तसेच, पोलिसांचं वाहन चालवलेल्या ड्रायव्हर, माजी अधिकारी यांचीही चौकशी करण्याचे आणि कॉल डेटा रेकॉर्ड्स तपासण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.