हिमाचल प्रदेशात अडकलेले १७ पुणेकर सुरक्षित, प्रशासनाची माहिती
उत्तरेकडील राज्यात सध्या अतिवृष्टी सुरु असून पूर आला आहे. त्यामुळे तेथील जनजीवन विस्कळित झाले आहे. पावसाने घातलेल्या थैमानामुळे अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. अशातच पुण्यातील १७ पर्यटक हिमाचल प्रदेशमध्ये अडकले होते. मात्र, पुण्यातून हिमाचल प्रदेशमध्ये गेलेले सर्व पर्यटक सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले आहे. याबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने बुधवारी माहिती दिली आहे.
उत्तर भारतातील अनेक भागांत पावसाने कहर केला असून मोठमोठे रस्ते, वाहने, इमारती, पूल वाहून गेल्याच्या घटना घडल्या आहेत. हिमाचल प्रदेशमधील व्यास नदीला मोठा पूर आला असून येथील ५० वर्षे जुना असलेला पूल वाहून गेला आहे. अशातच पुणे जिल्ह्यातील काही नागरिक हिमाचल प्रदेश राज्यात पर्यटनासाठी गेले आहेत. मात्र, ४ ते ९ जुलैपर्यंत चंदीगढ ते हिमालच प्रदेशातील मनाली येथे पर्यटनासाठी गेलेल्या १७ व्यक्तींचा संपर्क होत होत नव्हता.
या १७ पैकी मंगळवारी १० व्यक्तींचा संपर्क झाला होता. ते सुरक्षित स्थळी असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी जिल्हा प्रशासनाला दिली. मात्र, उर्वरित ७ पर्यटकांचा अद्यापही संपर्क होत नव्हता. बुधवारी दुपारपर्यंत इतर सर्व पर्यटकांसोबत संपर्क साधण्यात यश आले आहे, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी विठ्ठल बनोटे यांनी दिली.