पालघर लोकसभा मतदारसंघ: भाजपची पुन्हा बाजी!

उत्तर मुंबई आणि डहाणू या दोन मतदारसंघांमधून २००८ च्या पुनर्रचनेत पालघरची निर्मिती झाली. डहाणूतील बराचसा भाग आता पालघरमध्ये येतो. डहाणूमध्ये भाजप, कम्युनिस्टांची चांगली ताकद होती. त्यामुळे भाजपच्या चिंतामण वनगा यांनी डहाणुतून खासदार म्हणून प्रतिनिधित्व केलं आहे. यापूर्वी काँग्रेसच्या दामोदर शिंगडा यांनीही प्रतिनिधित्व केले आहे.

Political News

संग्रहित छायाचित्र

पालघरमध्ये शिवसेना आणि भाजपची थेट लढत झाली असली तरी हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीचा उमेदवारही रिंगणात होता. गुजरात सीमेला खेटून असलेल्या पालघरमधील तिरंगी लढतीत भाजपने अखेर बाजी मारली.

उत्तर मुंबई आणि डहाणू या दोन मतदारसंघांमधून २००८ च्या पुनर्रचनेत पालघरची निर्मिती झाली. डहाणूतील बराचसा भाग आता पालघरमध्ये येतो. डहाणूमध्ये भाजप, कम्युनिस्टांची चांगली ताकद होती. त्यामुळे भाजपच्या चिंतामण वनगा यांनी डहाणुतून खासदार म्हणून प्रतिनिधित्व केलं आहे. यापूर्वी काँग्रेसच्या दामोदर शिंगडा यांनीही प्रतिनिधित्व केले आहे. पुनर्रचनेनंतर एक पोटनिवडणूक आणि तीन नियमित निवडणुका झाल्या आहेत. उत्तर भारतीयांची संख्याही येथे चांगल्या प्रमाणात आहे. आदिवासी, कोकणी यांचीही संख्या लक्षणीय आहे. आदिवासी भागामध्ये काम असलेल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट आणि भारतीय जनता पक्षाचे मतदारसंघावर वर्चस्व मिळवण्याचे प्रयत्न सुरू असतात. काँग्रेसचीही एकेकाळी या मतदारसंघावर चांगली पकड होती. शिवाय वसई-विरार भागात वर्चस्व असलेले हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीचीही चांगली ताकद आहे. मध्यंतरी भाजप आणि शिवसेनेने पकड मिळवण्याचा प्रयत्न केला. यातूनच पालघरमध्ये २०२४ ला झालेल्या तिरंगी लढतीत भाजपच्या सावरा यांनी बाजी मारली.            

पूर्वइतिहास  

यापूर्वीच्या निवडणुकीवर नजर टाकली तर भाजप, काँग्रेस, हितेंद्र ठाकूर यांची बहुजन विकास आघाडी आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षात लढत झाल्याचे दिसते. २९२४ ला पालघरमध्ये झालेल्या तिरंगी लढतीत भारतीय जनता पक्षाचे डॉ. हेमंत सावरा यांनी उद्धव ठाकरे शिवसेनेच्या भारती कामडी यांचा पराभव केला. सावरांना ६ लाख १ हजार तर कामडींना ४ लाख १७ हजार मते मिळाली. सावरा १ लाख ८३ हजारांची आघाडी घेऊन विजयी झाले असले तरी तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या बहुजन विकास आघाडीच्या राजेश पाटील यांनी २ लाख ५४ हजार मते मिळवली. 

तिरंगी लढतीत हितेंद्र ठाकूर यांच्या उमेदवाराने ठाकरे सेनेच्या उमेदवाराचा घात केला असे म्हणता येईल. २०१९ च्या निवडणुकीत हा मतदारसंघ शिवसेनेने भाजपकडून मागून घेतला. त्यामुळे शिवसेनेचे राजेंद्र गावित यांनी ५ लाख ८० हजार मते घेत ८८ हजारांच्या आघाडीने विजय  मिळवला. यावेळी बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव यांनी ४ लाख ९१ हजार तर वंचितच्या सुरेश पाडवी यांनी १३ हजार ते  मिळाली होती. भाजपतर्फे निवडून गेलेले चिंतामणी वनगा यांचे निधन झाल्यानंतर २०१८ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत भाजप आणि शिवसेना वेगवेगळे लढले होते.  शिवसेनेने भाजपचे दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांचे पुत्र श्रीनिवास वनगा यांना मैदानात उतरवले होते. भाजपने काँग्रेसचे  माजी मंत्री असलेल्या राजेंद्र गावित यांनी उमेदवारी दिली. २ लाख ६२ हजार मते घेत गावित विजयी झाले. वनगा यांना २ लाख ४३ हजार मते मिळाली. बहुजन विकास आघाडीच्या बळीराम जाधवांना २ लाख २२ हजार तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या किरण महाला यांना ७१ हजारांच्या आसपास मते पडली होती. काँग्रेसच्या दामु शिंगडा यांना ४७ हजार मते पडली होती. पंचरंगी लढतीत गावित २२ हजारांच्या फरकाने विजयी झाले होते. 

२०१४ च्या निवडणुकीत मोदी लाटेत भाजपचे चिंतामणी वनगा ५ लाख ३३ हजार मते घेऊन दिल्लीत पोहोचले. बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव यांना २ लाख ९३ हजार तर मार्क्सवादी कम्युननिस्ट पक्षाच्या उमेदवाराला ७६ हजारांच्या आसपास मते पडली होती. यापूर्वी २००९  मध्ये बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव २ लाख २३ हजार मते घेऊन विजयी झाले होते. त्यावेळी भाजपचे चिंतामणी वनगा यांना २ लाख १० हजार तर काँग्रेसचे दामु शिंगडा यांना १ लाख ६२ हजार तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे लहानू कोम यांना ९२ हजार मते पडली होती.  २०२२ मध्ये शिवसेनेत दोन गट पडल्यावर मूळचे भाजपचे असलेले राजेंद्र गावित शिंदे गटाकडे झुकलेले होते. शिंदे शिवसेनेकडून गावितांना निवडणूक लढविण्याची इच्छा होती आणि तशी तयारीही त्यांनी केली होती. मात्र, २०१९ मध्ये शिवसेनेकडे गेलेला हा मतदारसंघ भाजपने हक्काने मागून घेतला आणि भाजपच्या सावरांना उमेदवारी देत त्यांना निवडूनही आणले. त्यावेळी नाराज झालेल्या गावित यांची भाजपने विधानसभेचे आश्वासन देत समजूत काढली.

राजकीय समीकरण?

पालघर मतदारसंघातील तीन मतदारसंघांमध्ये बहुजन विकास आघाडीचे आमदार आहेत तर इतर तीन मतदारसंघांत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे आमदार आहेत. वसईत हितेंद्र ठाकूर, नालासोपारामध्ये क्षितीज ठाकूर, बोईसरमध्ये राजेश पाटील (तिघेही बहुजन विकास आघाडी), डहाणूत विनोद निकोले (मार्क्सवादी कम्युनिस्ट ), विक्रमगडमध्ये सुनील भुसारा (राष्ट्रवादी शरद पवार गट ), पालघरमध्ये श्रीनिवास वानगा  ( शिंदे शिवसेना) असे राजकीय बलाबल आहे. एकूणच हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीचे या मतदारसंघावर वर्चस्व असल्याचे दिसते. ठाकरे शिवसेनेच्या भारती कामडी यांनी निवडणूक लढवली असली तरी मार्क्सवादी कम्युनिस्ट आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांच्या प्रत्येकी एका आमदाराची आणि शिवसेनेच्या निष्ठावान मतदारांची साथ मिळाली. बहुजन विकास आघाडीचे तीन आमदार असले तरी त्यांना पूर्णपणे मतदान झाल्याचे दिसत नाही. त्याऐवजी ही मते भाजपच्या खात्यात गेली असावीत असे दिसते. विधानसभा मतदारसंघाची पातळीवर पालघरवर भारतीय जनता पक्षाचं वर्चस्व नसले तरी लोकसभा मतदारसंघावर मात्र भाजपचे वर्चस्व असल्याचे आधीच्या आकडेवारीतून दिसते.

वनगा कुटुंबीयांना सापत्न वागणूक

चिंतामणी वनगा यांच्या निधनानंतर वनगा कुटुंबीयांना भाजपने सापत्न वागणूक दिल्याने मतदारसंघामध्ये नाराजी होती. त्यातच वनगा कुटुंबीयांनी थेट शिवसेनेत प्रवेश केल्याने भाजपची त्यावेळी चांगलीच कोंडी झाली होती. भाजपाचा आदिवासी चेहरा अशी ओळख असलेल्या उच्च विद्याविभूषित वनगा यांनी पालघरच्या सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात भरीव योगदान दिलं आहे. १९९६, १९९९ मध्ये लोकसभेवर निवडून गेलेले वनगा २००९ मध्ये विधानसभेवर निवडून आले. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत वनगा यांनी बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव यांचा २ लाख ३९ हजाराने पराभव केला होता. वनगा यांच्या निधनानंतर त्यांचा मोठा मुलगा श्रीनिवास इच्छुक होता. पोटनिवडणुकीत शिवसेनेनं श्रीनिवास वनगा यांना पक्षात घेऊन आपला मूळचा पाया मजबत करण्याचा प्रयत्न केला. गुजरात सीमेलगतच्या या मतदारसंघात शिवसेनेचा असा एक मतदारसंघ आहे.  

ठाकूर राज 

१९८८ पासून राजकारणात असलेल्या हितेंद्र ठाकूर यांचे वसई, पालघर, डहाणू भागात मोठे वर्चस्व आहे. प्रथम काँग्रेसमध्ये असलेल्या ठाकूरांनी नंतर काही काळ अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. त्यानंतर त्यांनी बहुजन विकास आघाडी या पक्षाची स्थापना केली. १९८८ मध्ये ते वसई तालुका युवा काँग्रेसचे अध्यक्ष झाले. १९९० ला वयाच्या २९ व्या वर्षी काँग्रेसकडून वसईमधून विधानसभेवर निवडले गेले. नंतर वसई विकास मंडळ नावाची आघाडी स्थापन केली. हीच आघाडी नंतर बहुजन विकासात आघाडीत सामील झाली. तीन मतदारसंघातील आमदारांबरोबर वसई-विरार महापालिका, वसई पंचायत समिती आणि विविध ग्रामपंचायतींवर ठाकूर गटाचे वर्चस्व आहे. ठाकूर यांच्या राजकारणाला विरोध करणारे विवेक पंडितही काही काळ आमदार होते. २०१४ ला ठाकूर यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातील माहितीनुसार ठाकूर यांच्यावर ८ फौजदारी खटले आहेत. त्यावेळी त्यांच्याकडे जंगम मालमत्ता १९ कोटी आणि १२ कोटीचे कर्ज होते.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story