संग्रहित छायाचित्र
विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly Election 2024) भाजपने ९९ उमेदवारांची नावे जाहीर झाली आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी ज्यांना उमेदवारी मिळाली नाही असे इच्छुक नाराज झाले आहेत. शिवाय ते बंडखोरी करण्याच्या तयारीत आहेत. सांगली आणि रत्नागिरीत मतदारसंघातही अशीच काहीशी स्थिती आहे. सांगलीत विद्यमान आमदार सुधीर गाडगीळ यांनाच पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या उमेदवारीला भाजप (BJP) नेते शिवाजी उर्फ पप्पु डोंगरे यांनी विरोध दर्शवला आहे. तर रत्नागिरीत भाजपचे माजी आमदार बाळ माने यांनी बंडाचे अस्त्र उगारले आहे. त्यांनी निवडणूक लढणारच असा निश्चय केला असून ते उबाठा गटात जातील अथवा तुतारी हाती घेतील, अशी शक्यता आहे.
आमदार सुधीर गाडगीळ (Sudhir Gadgil) हे सांगलीचे विद्यमान आमदार आहेत. बंडखोरी होऊ नये. नाराजीचे प्रमाण जास्त वाढू नये यासाठी भाजपने अनेक विद्यमान आमदारांनाच पुन्हा उमेदवारी दिली आहे. मात्र त्यांच्या उमेदवारीमुळे नाराजीच्या भर पडली आहे. या मतदारसंघातून शिवाजी उर्फ पप्पु डोंगरे हे इच्छुक होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी त्यांना शब्द दिला होता असा त्यांचा दावा आहे. विशेष म्हणजे गाडगीळांना निवडणूक लढवायची नव्हती. त्यांनी प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंना तसे स्पष्ट सांगितले होते. सुधीर गाडगीळ यांची उमेदवारी आपल्याला मान्य नाही. त्यामुळे मी बंडखोरी करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. डोंगरे हे माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत. शिवाय त्यांनी जिल्हा परिषद उपाध्यक्षपद ही भूषवलेले आहे. आता त्यांनी सांगली विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि पश्चिम महाराष्ट्र समन्वयक शेखर इनामदार, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे, पृथ्वीराज पवार, नितीन शिंदे, स्वाती शिंदे, माजी आमदार दिनकर पाटील आदींनी उमेदवारीची मागणी पक्षाकडे केली होती. इनामदार यांनी गेल्यावेळीही उमेदवारीसाठी प्रयत्न केले होते. मात्र यावेळी आपल्या नावाचा प्राधान्याने विचार केला जाईल अशी अटकळ बांधून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातूनही त्यांनी प्रयत्न केले. मात्र, हे प्रयत्न अयशस्वी ठरले. तर डोंगरे यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या माध्यमातून उमेदवारीसाठी प्रयत्न केले होते. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात भाजपचे माजी आमदार बाळ माने यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. या मतदारसंघात शिंदे गटाचे आमदार आहेत. माजी आमदार बाळ माने हे उद्धव ठाकरे गटात प्रवेश करून निवडणूक लढवतील, अशा चर्चा सुरू आहे. या चर्चा सुरू असताना माने यांनी अशा स्वरूपाची पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडल्याने महायुतीत मोठा ट्विस्ट निर्माण होण्याची शक्यता आहे.