उष्माघाताच्या १२ बळींना जबाबदार कोण?
#मुंबई
नवी मुंबईत झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यास उपस्थित असलेल्या नागरिकांपैकी आतापर्यंत १२ जणांचा उष्माघातामुळे मृत्यू झाला आहे. या बळींना जबाबदार कोण, असा सवाल करीत विरोधकांनी शिंदे सरकारवर तोफ डागली आहे.
सूर्य आग ओकत असताना भर ऊन्हात इतका मोठा शासकीय सोहळा करण्याची गरजच काय होती, असा प्रश्न आता विचारला जात आहे. केवळ राजकीय फायद्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारने लोकांचा बळी घेतला, असा हल्लाबोल विरोधकांनी केला आहे. राज्य सरकारवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह संपूर्ण सरकारी यंत्रणा तसेच भाजप आणि शिंदे गटाची यंत्रणा हा सोहळा भव्यदिव्य करण्यासाठी अनेक दिवसांपासून झटत होती. ‘महाराष्ट्र भूषण’ डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांचे देशभरात लाखो अनुयायी आहेत. विशेषत: कोकण, मुंबईत त्यांच्या अनुयायांची संख्या मोठी आहे. यापैकी बहुतांश लोक ठाकरेंच्या शिवसेनेला मानणारे होते. ही ‘व्होट बँक’ आकर्षित करण्याचे सरकारचे प्रयत्न होते. या सोहळ्याचे नियोजन मुख्यमंत्री शिंदे यांचे आर्थिक व्यवहार सांभाळणारे सचिन जोशी यांच्याकडे सोपवण्यात आले होते.
‘‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यासाठी तब्बल ७ लाख लोक सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत उन्हात होते. भरउन्हात हा कार्यक्रम ठेवल्याने तसेच आयोजकांच्या ढिसाळ नियोजनामुळे निष्पाप लोकांना जीव गमवावा लागला,’’ असा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला.
वृत्तसंस्था