लालबागचा राजाही गुजरातला पळवतील; शाह यांच्या भेटीवर संजय राऊत यांचा टोला

मुंबई: राज्यातील, मुंबईतील अनेक उद्योग गुजरातमध्ये पळवले, अनेक संस्था गुजरातमध्ये पळवल्या. त्याचप्रमाणे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह लालबागचा राजा गुजरातला घेऊन जातील, अशी जोरदार टीका उद्धव ठाकरे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Mon, 9 Sep 2024
  • 03:29 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

मुंबई: राज्यातील, मुंबईतील अनेक उद्योग गुजरातमध्ये पळवले, अनेक संस्था गुजरातमध्ये पळवल्या. त्याचप्रमाणे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह लालबागचा राजा गुजरातला घेऊन जातील, अशी जोरदार टीका उद्धव ठाकरे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केली.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह रविवारपासून दोन दिवस मुंबईच्या भेटीवर असून या दरम्यान ते लालबागच्या राजाचे दर्शन घेणार आहेत. गेल्या वर्षीही अमित शाह मुंबई दौऱ्यावर आले होते. याबाबत राऊत म्हणाले की, शाह काहीही करू शकतात. लालबागच्या राजाचं मोठं नाव आहे. देशभरातून लोक येतात. त्यामुळे लालबागचा राजा गुजरातला घेऊन जाऊ या, असेही त्यांच्या मनात येईल. लालबागचा राजा गुजरातला नेण्याचा प्रस्ताव ते ठेवतील. व्यापारी लोक आहेत. मी फार विचारपूर्वक बोलतोय. हे लोक महाराष्ट्राला शत्रू मानतात. भाजपाच्या अनेक लोकांना मुंबई लुटायची आहे. मुंबई लुटण्याकरता केंद्रीय मंत्री मुंबईत येत असतात. 

अमित शाहांच्या मुंबई भेटीबाबत राऊत म्हणाले, लालबागच्या राजाच्या दर्शनाला ते येत आहेत. येऊ द्या. मला तर सारखी भीती वाटते की उद्योग ज्या प्रमाणे पळवले, त्याप्रमाणे ते लालबागचा राजाही पळवतील.   शाहांना आमचा विरोध यासाठीच आहे की महाराष्ट्रात त्यांनी दळभद्री राजकारण करून महाराष्ट्र कमजोर करण्याचा प्रयत्न केला. मुंबई, महाराष्ट्रातून व्यापार, उद्योग, रोजगार आणि अनेक महत्त्वाची आर्थिक केंद्र गुजरातला नेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे अमित शाहांच्या बाबतीत महाराष्ट्राच्या भावना तीव्र आहेत. ते गृहमंत्री असले तरीही ते कमजोर गृहमंत्री आहेत. या महाराष्ट्राची कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे. जम्मू काश्मीर, मणिपूरमध्ये या गृहमंत्र्यांचं लक्ष नाही. राजकारण, पक्षफोडी, लूटमार यांना पाठिंबा देणं, मुंबई लुटणं, लुटणाऱ्याला पाठिंबा देणं अशी कामं होत आहेत. शिवसेना, राष्ट्रवादीसारखे स्वाभिमानी पक्ष फोडून महाराष्ट्र अस्थिर करणे अशी कामं त्यांनी केली. महाराष्ट्र विकलांग करायचं हे त्यांचं स्वप्न आहे. त्यासाठीच ते महाराष्ट्रात येत असतात. म्हणून महाराष्ट्राची जनता त्यांना शत्रू मानते.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest