बाजार समिती निवडणुकीत महाविकास आघाडीची सरशी
#मुंबई
महाराष्ट्रातील ग्रामीण भागाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत सत्ताधारी भाजप-शिंदे गटाला दणका देत महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारली आहे. शनिवारी (दि. २९) संध्याकाळी पाचपर्यंत हाती आलेल्या निकालांनुसार, मविआने १४७ पैकी ७६ बाजार समित्यांवर सत्ता मिळवली आहे.
सत्ताधारी महायुतीला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे. त्यांना अवघ्या ३१ बाजार समित्यांवर सत्ता मिळवण्यात यश आले. सत्तेसाठी ज्या काही सर्वपक्षीय आघाड्या झाल्या, त्यांनी लक्षणीय कामगिरी करताना २४ बाजार समित्यांवर झेंडा फडकावला. अपवाद वगळता राज्यातील बहुतांश नेत्यांनी आपापल्या बाजार समित्यांमध्ये गड राखले आहेत.
बीड जिल्ह्यात पंकजा मुंडे, नाशिक जिल्ह्यात मंत्री दादा भुसे यासारख्या नेत्यांच्या गटाला पराभवाचा धक्का बसला आहे. परळी येथे धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांना धक्का दिला असून १८ पैकी ११ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसने विजय मिळवला. मुरबाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने १८ पैकी १५ जागा जिंकत एकहाती सत्ता मिळवली आहे. नांदेड जिल्ह्यातील भोकर बाजार समितीत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आपला गड शाबूत राखला आहे. १८ पैकी १५ जागांवर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने सत्ता कायम राखली.
काही ठिकाणी सत्तेसाठी निर्माण झालेल्या अभद्र युतींनासुद्धा मतदारांनी नाकारल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे राज्यातील निकालामध्ये संमिश्र यश उमटलं आहे. विदर्भात सुनील केदार, आशिष जायस्वाल यांच्या युतीचा त्यांच्याच कार्यकर्त्यांच्या पॅनलने केलेला पराभव चर्चेचा विषय ठरला आहे. चंद्रपुरात काॅंग्रेस खासदार बाळू धानोरकर यांना मोठा धक्का बसला. तेथे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि माजी पालकमंत्री काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या युतीने बाजी मारली. संगमनेरमध्ये विखे पाटील गटाला बाळासाहेब थोरातांनी धक्का देत भोपळाही फोडू दिला नाही. येथे सर्व १८ जागांवर काँग्रेसने बाजी मारली आहे.
वृत्तसंस्था