राजकीय नेते काही साधुसंत नाहीत
#नागपूर
भारतीय जनता पक्षाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री आपल्या मनात जे विचार असतील ते स्पष्टपणे मांडण्यासाठी प्रसिद्ध आहेत. हे मत मांडताना ते कोणाचीही भीड ठेवत नाहीत. त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे माध्यमांना अनेकदा बाईट मिळत राहतात. प्रसिद्धी झोतात राहणे हा यामागचा त्यांचा हेतू नसल्याचे अनेकांना माहिती आहे. स्पष्टवक्तेपणा हा त्यांच्या स्वभावाचा भाग आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प मांडताना अनेक कर सवलती, मोफत अन्न-धान्य आदी विविध घोषणा केल्या.
अर्थात त्यावर विरोधकांनी निवडणुकीपूर्वीचा मतपेरणी करणारा मतसंकल्प असल्याची टीका केली. या टीकेवर आपले मत मांडताना गडकरींना आपल्या स्पष्टवक्तेपणाचे दर्शन घडवले आहे. एका वृत्तवाहिनीवरील मुलाखतीवेळी गडकरी म्हणाले की, प्रत्येक राजकीय नेता निवडणुका समोर ठेवूनच काम करत असतो. आम्ही राजकारणी आहोत, साधू-संत नाही, हे निखळ सत्य आहे. त्यामुळे आम्हीही निवडणुका समोर ठेवून काम करतो. २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीचे प्रतिबिंब या मतसंकल्पात आहे, या प्रश्नावर गडकरी म्हणाले की, आम्ही पूजा-पाठ करण्यासाठी नाही तर निवडणुका जिंकण्यासाठी राजकारणात प्रवेश केला आहे.
चांगले काम केले तर आम्ही निवडून येतोच. लोकांना दिलासा देणे हे नेत्यांचे काम आहे. दक्षिणेतील राज्ये तर मोफत वीज देतात, मात्र, त्यामुळे तोटा किती होतो हे कोणी पाहात नाही.