कर्मचाऱ्यांचे लाड पुरे, पेन्शन शेतकऱ्यांना द्या
#पुणे
अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास पळवला आहे, राज्यभरात अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे होणे गरजेचे आहे. असे असताना सरकारी कर्मचारी मात्र जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी यासाठी बेमुदत संपावर गेले आहेत. भरपूर वेतन घेऊन जुन्या पेन्शनसाठी संप करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी जरा मनाची लाज बाळगून शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात आधार द्यायला हवा. सरकारही संप घेण्याची विनंती करत आहे. पण संपकरी माघार घ्यायला तयार नाहीत, त्यामुळे सरकारने आता यांचे लाड बंद करावेत, जी काही पेन्शन द्यायची असेल ती शेतकऱ्यांना द्यावी, अशी मागणी करणारे रौंधळवाडी ग्रामपंचायतीने थेट मुख्यमंत्र्यांना लिहिले आहे. या पत्रातून शेतकऱ्यांच्या मनात कर्मचाऱ्यांबद्दलचा आक्रोश उघड झाला आहे.
राज्यभरात १७ लाखांहून अधिक शासकीय, निमशासकीय कर्मचारी गेल्या काही दिवसांपासून बेमुदत संपावर गेले आहेत. संपकरी आणि सरकारमध्ये बोलणी न झाल्याने जनतेची अनेक सरकारी कामी खोळंबली आहेत. पुण्यासह राज्यभरात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे, अशावेळी सरकारी कर्मचाऱ्यांनी संवेदनशीलता दाखवत कामावर परत यायला हवे. मात्र कर्मचारी अशी संवेदनशीलता न दाखवता आपल्या मागण्यांवर अडून बसले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपकाऱ्यांना संप मागे घेण्याची विनंती केली आहे. मात्र संपकरी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. पुणे जिल्ह्यातील अनेक गावांत अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास पळवला आहे. त्यात संप सुरू असल्याने नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे रखडले आहेत. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील रौंधळवाडी ग्रामपंचायतीने थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून 'राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांचे भरपूर लाड पुरवले, सरकार तुम्ही जरा थांबा, ज्या काही पेन्शन योजना चालू करायच्या आहे त्या माझ्या शेतकरी वर्गासाठी चालू करा.' अशी मागणी केली आहे. शेतकरी मोठ्या प्रमाणात या संपकऱ्यांवर नाराज असल्याचे या पत्रातून दिसत आहे. रौंधळवाडी ग्रामपंचायतीच्या या पत्राची सध्या राज्यभरात जोरदार
चर्चा सुरू आहे.वृत्तसंस्था