समस्यांवर होत नाही मन की बात : राऊत
#मुंबई
महाराष्ट्र राज्यासह देशात अनेक प्रश्न आहेत. मात्र ‘मन की बात’ मध्ये अशा समस्यांवर चर्चा होत नाही, अशी टीका ठाकरे गटाचे राष्ट्रीय प्रवक्ते संजय राऊत यांनी रविवारी (दि. ३०) केली.
‘‘अवकाळी पावसामुळे महाराष्ट्र संकटात आहे. सत्तेसाठी सध्या येथे अत्यंत घाणेरडे राजकारण सुरू आहे. महाराष्ट्राच्या स्वाभिमानावर, अस्मितेवर आघात होत आहेत. ‘मन की बात’मुळे कळले की केंद्र सरकारकडे खूपच वेळ आहे, पण राज्यात आणि देशात अनेक प्रश्न असूनही त्यावर हे सरकार कुठलीही ‘मन की बात’ करत नाही. केंद्रातील प्रमुख, राज्यातील प्रमुख तासन् तास एकत्र बसून भाषण ऐकतात. सरकारला किती वेळ आहे आणि काम आहे, हे या कार्यक्रमाच्या निमित्ताने दिसले,’’ असे राऊत यांनी सुनावले.
राऊत म्हणाले, ‘‘१ मे रोजी मविआच्या वज्रमूठ सभेचे आयोजन शिवसेनेकडून होत आहे. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यात जास्त लक्ष घालत आहेत. १ मे या दिवशी महाराष्ट्राची राजधानी मुंबईत सभा होणे याला महत्त्व आहे. या तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते या सभेला उपस्थित राहतील. भाषणाचे मुख्य आकर्षण उद्धव ठाकरेच राहतील कारण मुंबईत सभा आहे.’’
वृत्तसंस्था