लाचखोरीही आता चालते टक्केवारीच्या हिशोबाने
#औरंगाबाद
लाचखोरी करणाऱ्यांमध्ये सरकारी सेवेत असणारे कर्मचारी आघाडीवर असतात, ही काही आता नावीन्याची बाब राहिली नाही. त्यातही पोलीस, महसूल खात्यातील कर्मचारी लाचखोरीत आघाडीवर असतात. तक्रारीनंतर त्यांना अटकही होते आणि छायाचित्रासह ते प्रसारमाध्यमांत आणि आता सोशल मीडियामध्ये चांगले झळकतात. यातील काहीजण तर ट्रेडिंगमध्येही असतात. बर त्यांच्यावर कारवाई झाल्यावर त्यांचा गुन्हा सिद्ध होऊन शिक्षा झाल्याचे मात्र काही ऐकीवात येत नाही. एकप्रकारे लाचखोरीला लोकमान्यता मिळत असल्याचे चित्र आहे.
त्यातच लाचखोरीच्या कारवाईतून सुटण्यासाठी अनेकजण वेगवेगळ्या कल्पना लढवतात. थेट कारवाई होऊ नये यासाठी कोणी धनराशी स्वीकारण्यासाठी पंटर ठेवतात किंवा दुसऱ्याच्या खात्यांचा वापर करतात. वाढती महागाई आणि गरजांमुळे कोणी किती आणि कसं खावं याला काही धरबंद राहिलेला नाही. अशीच कल्पना लढवणारा एक अधिकारी आढळला असून त्याने प्रकल्प खर्चाच्या टक्केवारीनुसार लाचेची रक्कम निश्चित केली असून ती स्वीकारताना त्याला अटक केली आहे.
औरंगाबाद विभागातील जलसंधारण खात्यात हा प्रकार घडला असून एका अधिकाऱ्याला तब्बल आठ लाखांची लाच घेताना अटक करण्यात आली आहे. ऋषीकेश देशमुख असे या अधिकाऱ्याचे नाव असून त्याच्याकडे मंजुरीसाठी आलेल्या प्रकल्पाचा खर्च होता १ कोटी ३७ लाख. या कामासाठी त्याने साडेसात टक्क्याने लाच मागितली. ही रक्कम साधारण आठ लाख होती. देशमुख हे जलसंधारण खात्याच्या औरंगाबाद विभागात काम करतात. वैजापूर कार्यालयात काम करणारे देशमुख कार्यालयाबाहेर लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांच्यावर कारवाई केली. कारवाईवेळी सापडलेल्या चिठ्ठीत कोणाला किती रक्कम द्यायची याचाही उल्लेख होता.
टक्केवारी आणि लाचेचे वाटप याचा सविस्तर तपशील असल्याने लाचखोरी कशी शिस्तबद्ध चौकटीतून चालते हे कळून येते. गेल्या काही वर्षांतील ही मोठी कारवाई असून लाचेची रक्कमच जर आठ लाख असेल तर लाचखोरीची कीड किती खोलवर गेलेली आहे हे समजते.