महाराष्ट्रात H3N2चा पहिला बळी
#मुंबई
महाराष्ट्रात H3N2 या विषाणूचा संसर्ग वाढला असून या बुधवारी (दि. १५) आजारामुळे राज्यात पहिला मृत्यूची नोंद झाली आहे. या आजारामुळु झालेला हा राज्यातील पहिला तर देशातील तिसरा मृत्यू आहे. H3N2 इन्फ्लुएन्झा या विषाणूजन्य आजाराचे आतापर्यंत राज्यात ३५२ रुग्ण आढळले आहेत.
अहमदनगरमध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेत असलेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील २३ वर्षीय तरुणाला H3N2 विषाणूचा संसर्ग झाला होता. नजिकच्या दवाखान्यात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. H3N2 इन्फ्लुएन्झा या संसर्गजन्य आजारामुळे त्याचा मृत्यू झाल्यामुळे राज्याचा आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. राज्यात या संसर्गजन्य आजाराच्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. ‘‘आतापर्यंत H3N2 एन्फ्लुएन्झाच्या रुग्णांची संख्या ३५२ वर पोहोचली आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू असून राज्यातील परिस्थिती नियंत्रणात आहे,’’ अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिली.
राज्यातील H3N2 विषाणूची लागण झालेल्या राज्यातील रुग्णांवर सध्या उपचार सुरू असून रुग्णालयांना अलर्ट राहण्यास सांगितले. H3N2 इन्फ्लुएन्झा हा आजार घातक नाही, योग्य उपचारांनी तो बरा होऊ शकतो. त्यामुळे घाबरण्याची गरज नाही, असेही आरोग्यमंत्र्यांनी नमूद केले.वृत्तसंस्था