राज्याच्या घोटाळेबाज मंत्र्यांना घेरणार ? राष्ट्रवादीची नवी रणनीती, अधिवेशनात शिंदे सरकारची झोप उडवणार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारबाबत उद्धव ठाकरे गटाची शिवसेना आक्रमक पवित्रा घेत असून राष्ट्रवादी काँग्रेस म्हणावी तशी आक्रमक होताना दिसत नसल्याचे चित्र असले तरी आता हे चित्र बदलणार आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीच सर्वांना या सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेण्याचे आदेश दिले असल्याची चर्चा आहे.
येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशात शिंदे-फडणवीस सरकारला कोंडीत पकडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने नवी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रवादीच्या आमदारांनी अधिक आक्रमक व्हावे, शिंदे-फडणवीस सरकारमधील नेत्यांची प्रकरणे बाहेर काढावी, अशा सूचना राष्ट्रवादीच्या नेत्यांना पक्षश्रेष्ठींकडून देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पुण्यातील कसबा विधानसभा पोटनिवडणुकीतील घडामोडींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची मुंबईत बैठक पार पडली. या बैठकीत पक्षातील वरिष्ठांनी राष्ट्रवादीच्या आमदारांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी यापुढील काळात अधिक आक्रमक व्हावे, असे आदेश देण्यात आले आहेत.
घोटाळ्याचे आरोप झालेल्या मंत्र्यांना करणार टार्गेट
शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्र्यांची तसेच नेत्यांची घोटाळा प्रकरणे बाहेर काढावी, अशा सूचना या बैठकीत राष्ट्रवादीच्या वरिष्ठांकडून आमदारांना देण्यात आल्याची माहिती आहे. या बैठकीला राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, अमोल मिटकरी यांच्यासह राष्ट्रवादीच्या इतर आमदारांचा समावेश होता. शिंदे गटातील काही मंत्री त्यांच्या कार्यशैलीमुळे प्रकाशझोतात आले आहेत. तसेच शिंदे गटाच्या काही मंत्र्यांची प्रकरणे गाजली आहेत. या घोटाळ्याचे आरोप झालेल्या नेत्यांची प्रकरणे टार्गेट करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.