परतीचे वेध लागूनही त्या बाबाला उपरती नाही रोहित पवारांची कोश्यारींवर टीका, वक्तव्यांबाबत माफीची अपेक्षा
बागेश्वर बाबाला उपरती झाल्याने त्याने जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकोबारायांबद्दलचे विधान मागे घेतले. पण मुंबईत समुद्र किनाऱ्यावर बसलेल्या बाबाला परतीचे वेध लागले तरी उपरती होत नाही, हे दुर्दैव असल्याचे सांगत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींवर निशाणा साधला आहे. संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या धीरेंद्र कृष्ण शास्त्रीने त्याचे वक्तव्य मागे घेत माफी मागितली. कोश्यारी यांनीही परत जाण्यापूर्वी धीरेंद्र शास्त्रीचा कित्ता गिरवावा, अशी अपेक्षा पवारांनी व्यक्त केली आहे.
संत तुकारामांना त्यांची पत्नी मारहाण करायची म्हणून ते भक्तीमार्गाला लागले, अशी मुक्ताफळे धीरेंद्र शास्त्रीने उधळली होती. आता शास्त्रीने विधान मागे घेत दिलगिरी व्यक्त केली आहे. मात्र महाराष्ट्रातील महापुरुषांबद्दल वादग्रस्त विधाने करणाऱ्या कोश्यारी यांनी दिलगिरी व्यक्त केलेली नाही. रोहित पवार यांनी ट्विटरवरून धीरेंद्र शास्त्री आणि राज्यपालांवर टीकास्त्र सोडले आहे. त्यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये, बागेश्वर बाबाला उपरती झाल्याने त्याने जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकोबारायांबद्दलचे विधान मागे घेतले. पण मुंबईत समुद्र किनाऱ्यावर बसलेल्या बाबाला परतीचे वेध लागले तरी उपरती होत नाही, हे दुर्दैव आहे, असे म्हटले आहे. मुंबईत राज्यपालांचा बंगला मलबार हिल येथे समुद्र किनाऱ्यावर आहे. त्यामुळे रोहित पवारांनी नाव न घेता राज्यपालांना टोला लगावला आहे.
वादग्रस्त वक्तव्यांमुळेच गाजली कोश्यारींची कारकीर्द
महाराष्ट्राचे राज्यपाल भगसिंह कोश्यारी सातत्याने वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे चर्चेत असतात. महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची त्यांची कारकीर्द त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळेच गाजली आहे. त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यांमुळे त्यांना अनेकदा विरोधी पक्षांसह महाराष्ट्रातील जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल राज्यपालांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. तसेच मुंबईतल्या मराठी माणसांबद्दलदेखील त्यांनी वादग्रस्त वक्तव्य करून मुंबईकरांचा रोष ओढवून घेतला होता. दरम्यान, अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई भेटीवर आले असता राज्यपाल कोश्यारी यांनी त्यांना या (राज्यपालपदाच्या) जबाबदारीतून मुक्त करावे, अशी
इच्छा व्यक्त केली होती. परंतु त्यांनी अद्याप राजीनामा दिलेला नाही, त्यामुळे ते सध्या विरोधकांच्या टीकेचा सामना करत आहेत. हाच धागा पकडत आमदार रोहित पवार यांनी कोश्यांरीवर निशाणा साधला आहे.