महाराष्ट्राचा चौफेर विकास सुरु आहे
#नागपूर
मुख्यमंत्र्यांचे लक्ष संपूर्ण महाराष्ट्रावर आहे. राज्याचा चौफेर विकास सुरू आहे. विकासापासून कुठलाही भाग वंचित राहणार नाही, असा दावा मुख्यमंत्र्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी मंगळवारी (दि. ९) केला.
श्रीकांत शिंदे म्हणाले, ‘‘साडेतीनशे कोटींच्या कामाचे भूमिपूजन भंडारा येथे होणार आहे. विदर्भाला निधी देण्याचे काम मुख्यमंत्र्यांनी केले आहे. लोकांना हवे असलेले सरकार राज्यात आहे. जनतेने खऱ्या अर्थाने कौल दिलेले सरकार दहा महिने अगोदर सत्तेत आले. या कालावधीत जवळपास साडेबारा हजार कोटी आर्थिक मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली. त्यामुळे सर्वांना आपला मुख्यमंत्री असल्याचे जाणवते आणि हे चित्र संपूर्ण महाराष्ट्रात आहे.’’
राजकारणात टीकेचा स्तर घसरला असून महाराष्ट्राच्या संस्कृतीला प्रदूषित करण्याचे काम सध्या सुरू असल्याचे श्रीकांत शिंदे यांनी नमूद केले. ते म्हणाले, ‘‘सकाळपासून शिव्याशाप देण्याचे काम विरोधकांकडून सुरू आहे. महाराष्ट्राने यापूर्वी अशा पद्धतीने टीका पाहिलेली नाही. सत्तेसाठी विचारांना बाजूला करून हे एकत्र आले आहे. वज्रमूठ एकजूट दाखवत आहे. मात्र ती वज्रमूठ राहते की वज्रझूठ ठरते हे पाहावे लागेल. निवडणूक आयोगाचा निकाल आमच्या म्हणजेच सत्याच्या बाजूने लागला. बहुमत आमच्याकडे आहे. सगळ्यांना स्वप्न बघण्याचा अधिकार आहे. लोक दिवसा स्वप्न पाहतात. आम्ही त्यावर भाष्य करणार नाही.’’