मराठवाड्यात अवकाळीमुळे २५ जण दगावले
#छत्रपती संभाजीनगर
यंदाच्या उन्हाळ्यात आलेल्या अवकाळी पावसाने संपूर्ण महाराष्ट्राला तडाखा दिला आहे. यात मराठवाड्यामध्ये सर्वाधिक नुकसान झाले. एकट्या एप्रिल महिन्यात मराठवाड्यामध्ये तब्बल २५ नागरिकांचा अवकाळी पावसामुळे मृत्यू झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच मराठवाड्यातील अनेक भागांत अवकाळी पाऊस हजेरी लावत आहे. सोबतच जोरदार गारपीट, वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट पाहायला मिळत आहे. त्यामुळे एप्रिल महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. एप्रिल महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांत मिळून २५ जणांचा मृत्यू झाला आहे.
मराठवाड्यामध्ये अवकाळीमुळे एकट्या एप्रिल महिन्यात २९ जण जखमी झाले आहेत. याशिवाय ४५२ लहान-मोठ्या जनावरांचा जिवाचा घास अवकाळी पावसाने घेतला. या दरम्यान, तब्बल १,५९३ कोंबड्यादेखील दगावल्या आहेत. वादळ तसेच मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी घरांची पडझडदेखील झाली आहे.
आधीच अतिवृष्टीमुळे खरिपाचा हंगाम हातातून गेला आहे. त्यामुळे रब्बी हंगामात काहीतरी हातात येईल, अशी अपेक्षा असताना मार्च आणि एप्रिल महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे तत्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी करण्यात येत आहे.
दरम्यान, अवकाळी पावसामुळे मराठवाड्यात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी कृषिमंत्री अब्दुल सत्तार शेतकऱ्यांच्या बांधावर गेले होते. सत्तार यांनी सिल्लोड तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाचा दौरा केला. यावेळी त्यांनी झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना धीर देत झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिल्या.वृत्तसंस्था