पिंपरी-चिंचवड : आरटीओ साधणार स्कूलचालकांशी संवाद
शहरात स्कूलबस अपघाताच्या पार्श्वभूमीवर आरटीओ विभागाने कार्यवाही सुरू केली आहे. एकीकडे नियमबाह्य व अनफिट बसचालकांची तपासणी करून कारवाई करण्यात येणार आहे, तर दुसरीकडे शाळा प्रशासनाशी संवाद साधून त्याबाबतच्या सूचना दिल्या आहेत. जवळपास ८०० हून अधिक
स्कूलचालकांना ईमेलद्वारे शालेय परिवहन समिती स्थापन करण्याबाबत कळवले आहे. त्याचप्रमाणे ग्रामीण भागात देखील येत्या काळात ड्राईव्ह घेण्यात येणार आहे.
दरम्यान, 'सीविक मिरर'ने 'स्कूल बस अपघातानंतरही आरटीओ निद्रिस्त' या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्यामध्ये आरटीओच्या वतीने स्कूलबसची तपासणी वाढवण्याबाबत अधोरेखित केले होते. या वृत्ताची दाखल घेत आरटीओच्या वतीने पुढाकार घेऊन स्कूलचालकांशी संवाद चालू साधला जाणार आहे. जेणेकरून स्कूल बसचालकांसह सर्वांचेच प्रश्न समजून घेता येतील.
क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची वाहतूक करणे, वाहतूक नियमांचे पालन न करणे, वाहनयोग्यता तपासणी न करणे, यासह अनेक कारणांमुळे स्कूल बसच्या अपघातांचे प्रमाण पिंपरी-चिंचवड शहरात वाढले आहे. यामध्ये प्रमुख जबाबदारी असलेले आरटीओ विभागाकडून कोणत्याही प्रकारची ठोस अशी कारवाई होत नसल्याची ओरड होत आहे. जुलै महिन्यामध्ये दोन वेगवेगळ्या ठिकाणी स्कूलबसचे अपघात झाले. या घटनेनंतर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्याचप्रमाणे पालकही चिंतेत आहेत. आळंदी-चऱ्होली आणि चिंचवड या ठिकाणी अपघात घडल्यानंतर प्रामुख्याने आरटीओ विभाग जागा झाला आहे. शहरातील प्रलंबित असलेल्या स्कूल बसच्या फिटनेसबाबतची माहिती गोळा केली आहे. आरटीओच्या भरारी पथकाच्या वतीने स्कूल बसची तपासणी केली जात आहे. जून आणि जुलै महिन्यात एकूण ३०० स्कूल बसचालकांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये १०५ स्कूल बसचालक दोषी आढळले आहेत.
अशी असणार परिवहन समिती
प्रत्येक शाळेत मुख्याध्यापकांच्या नेतृत्वाखाली परिवहन समिती आवश्यक आहे. या समितीमध्ये पालक संघ, वाहतूक पोलीस, आरटीओचे कर्मचारी आदीसह काही जण सदस्य असतात. या बैठकीमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत आणि शालेय वाहतूक व्यवस्थेविषयी चर्चा होते. त्यानुसार सर्व विभाग त्या-त्या अनुषंगाने पुढील कार्यवाही करत असतात.
खासगी शाळा प्रशासनाचे दुर्लक्ष
पिंपरी-चिंचवड शहरातील खासगी शाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ने-आण करण्यासाठी वाहन पुरवले जाते. दरम्यान, संबंधित स्कूल बसचालकाची व्यवस्थित माहिती घेण्याचीच तसदी शाळा प्रशासन घेत नाही. त्याचप्रमाणे पालकांच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर त्यावर कोणती कारवाई होत नसल्याने अशा बेजबाबदार स्कूल बसचालकांचे फावत आहे.
अनेकदा स्कूल बसचालकांचे वेगावर नियंत्रण नसते. काही वेळा बदली गाडी देण्यात येते, याची माहिती पालकांना नसते. परिणामी, यातून अपघात होण्याची शक्यता आहे. शॉर्टकटच्या नादात असे प्रकार घडू शकतात. वेळोवेळी चालकांची तपासणी होणे आवश्यक आहे.
- गौरी शितोळे, पालक
जून आणि जुलै महिन्यात आम्ही ३०० स्कूल बसची तपासणी केली. दोषी चालकांवर कारवाई केली आहे. जिल्हास्तरावर आम्ही परिवहन समितीच्या बैठका घेणार आहोत. त्याचप्रमाणे शहर परिसरातील स्कूल मॅनेजमेंटला बैठक घेण्याचे कळवलेले आहे. आरटीओचे अधिकारीही तपासणी दरम्यान शाळेच्या संबंधित विभागाला सांगत आहेत.
- संदेश चव्हाण, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी-चिंचवड