पालखी मार्ग होणार आता हिरवागार!
विजय चव्हाण
श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्ग हा राज्यातील देहू आणि पंढरपूर या दोन महत्त्वाच्या धार्मिक स्थळांना जोडतो. या पालखी मार्गावर चंदन, तुळशी, इतर सुगंधित वृक्षांबरोबरच वड, कडुनिंब, पिंपळ, चिंच या सावली देणाऱ्या वनौषधी वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. यामुळे हा मार्ग हिरवागार होणार अाहे. भारतीय जनता पक्षाचे नेते, केंद्रीय रस्ता, महामार्ग बांधकाम मंत्री नितीन गडकरी आणि माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी श्री संत ज्ञानेश्वर महाराज आिण श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची शनिवारी पाहणी केली.
श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्ग हा राष्ट्रीय महामार्ग ९६५ चा भाग आहे. यातील १३० कि.मी. लांबीचा महामार्ग हा पुणे जिल्ह्यातील पाटस-बारामती-इंदापूर-अकलूज-बोंडलेपर्यंत विकसित करण्यात येत आहे. या मार्गावर एकूण ११ पालखी स्थळे असून वारकऱ्यांच्या सोयीसाठी येथे सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या पालखी मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण करण्यात येणार आहे. तसेच आवश्यक त्या ठिकाणी महाराष्ट्रातील संत, महात्मे यांची शिल्पे, भित्तिचित्रे, अभंगवाणीचा वापर करून सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे. यामुळे मार्गाच्या सौंदर्यात भर तर पडेलच. शिवाय मार्गावरील सुविधांचा फायदा वारकऱ्यांना होईल.
पालखी मार्गावर विशिष्ट प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. त्यामध्ये विशेषतः चंदन, तुळशी आदी सुगंधित वृक्षांबरोबरच वड, कडुनिंब, पिंपळ, चिंच या घनदाट सावली देणाऱ्या वनौषधी वृक्षांची लागवड करण्यात येत आहे. सध्या रस्त्याच्या मध्ये ५७,२०० तसेच दोन्ही बाजूस १८,८४० औषधी वृक्षांची लागवड केली आहे.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग (राष्ट्रीय महामार्ग - ९६५) हा एकूण २३४ किमी लांबीचा मार्ग आहे. हडपसर (पुणे) - सासवड - जेजुरी - नीरा - लोणंद - फलटण - नातेपुते - माळशिरस - बोंडले - वाखरी - पंढरपूर असा हा मार्ग असून या चौपदरी रस्त्याच्या दोन्ही बाजूला वारकऱ्यांच्या सोयीसाठी स्वतंत्र पालखी मार्ग समाविष्ट केलेला आहे. या मार्गावर एकूण १२ पालखी स्थळे असून या ठिकाणी वारकऱ्यांसाठी आवश्यक त्या सुविधा पुरविण्यात येतील.