पालिका भूजल पातळी उंचावणार
विजय चव्हाण
बांधकामे तसेच इतर कारणांनी पुणे शहर आणि परिसराची भूजल पातळी कमालीची खालावली आहे. या पातळीत वाढ व्हावी, यासाठी शहरातील बोअरवेल, विहिरी तसेच डकवेलचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.
या विषयाचा आराखडा तयार करण्यासाठी स्वयंसेवी संस्था तसेच जलपुनर्भरणासाठी काम करणाऱ्या संस्थांची बैठक महापालिकेत घेण्यात आली. या संदर्भात माहिती देताना अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमणार म्हणाले, ‘‘शहरातील भूजल साठ्याचे जलपुनर्भरण करण्यासाठी महापालिकेकडून उपाययोजना केल्या जात आहेत. त्यासाठी या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांच्या प्रतिनिधींची बैठक बोलविण्यात आली होती. या संस्थांनी शहराच्या भूजलच्या रचनेचे नकाशे तसेच झऱ्यांचे सर्वेक्षण केलेले आहे.’’
डेक्कन कॉलेजच्या आर्किऑलॉजिकल विभागाच्या अभ्यासानुसार, पुण्यात एकूण १,५०० विहिरी होत्या. त्यानुसार, जलपुनर्भरण करण्यासाठी काय उपाययोजना करता येतील, यासाठी बैठका घेण्यात येत आहेत. त्यात अनेक पर्याय पुढे आले असून या अनुषंगाने शहरासाठी स्वतंत्र आराखडा केला जाणार आहे. मात्र, त्यासाठी आधी ‘शहरात भूगर्भातून किती पाण्याचा उपसा केला जातो,’ हे समोर येणे आवश्यक आहे. त्यासाठी शहरातील बोअरवेल, विहिरी तसेच डकवेलचे सर्वेक्षण केले जाणार आहे. त्यानंतर या माहितीच्या आधारावर स्वतंत्र आराखडा तयार केला जाणार आहे.
तीन पिढ्यांपूर्वी बांधलेल्या काही साचेबद्ध विहिरी आजही चांगल्या पद्धतीने सिंचनासाठी वापरात आहेत. या विहिरींच्या तुलनेत अगदी अलीकडच्या काळात काही वर्षांपूर्वीच बांधण्यात आलेल्या छोट्या-छोट्या बंधाऱ्यांची अवस्था मात्र खिळखिळी झालेली आहे. दहा दशकांपूर्वी इंजिनिअरच्या मार्गदर्शनाशिवाय बांधल्या गेलेल्या या विहिरी आजही या भागात भक्कम उभ्या आहेत. विशेष म्हणजे, अनेक विहिरींचे तीन पिढ्यांपूर्वीचे बांधकाम असूनदेखील या विहिरी सप्टेंबर १९९३ च्या भूकंपात आणि नंतरही अस्तित्व टिकवून आहेत