शिक्षण विभागाचा गोंधळात गोंधळ
सीविक मिरर ब्यूरो
पाठ्यपुस्तकांमध्ये कोरी पाने जोडण्याबाबत शालेय शिक्षण विभागातच गोंधळाची स्थिती असल्याचे दिसून येत आहे. २ मार्च रोजी प्रसिद्ध केलेल्या शासन निर्णयात बदल करून सुधारित निर्णय बुधवारी प्रसिद्ध करण्यात आला असून, आता दुसरी ते आठवीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये कोरी पाने जोडली जाणार आहेत. तर नववी आणि दहावी या इयत्तांना या निर्णयातून वगळण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळातर्फे २०२३-२४ या शैक्षणिक वर्षापासून पाठ्यपुस्तकांमध्ये वह्यांची कोरी पाने जोडली जाणार आहेत. पथदर्शी पद्धतीने राबवल्या जाणाऱ्या योजनेअंतर्गत प्रत्येक घटक, पाठ, कविता यांच्या शेवटी कोरे पान जोडून पुस्तकांची चार भागांमध्ये विभागणी करण्यात येणार आहे.
माझी नोंद या सदराखाली विद्यार्थी शिक्षक शिकवत असताना किंवा पाठ समजून घेत असताना या वह्यांच्या जोडलेल्या पानांवर लिहिणार आहेत. तसंच शब्दार्थ, महत्त्वाची सूत्रे, महत्वाचे संबोधन, महत्त्वाची वाक्य या पानांवर नोंद करुन ठेवायची आहेत. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात याबाबत निर्णय घेण्यात आला होता. आता शिक्षण विभागाने यात बदल केला आहे. मात्र पाठ्यपुस्तकांमध्ये कोरी पाने जोडण्यातून मुलांचे दप्तराचे ओझे कमी होणे, वह्यांचा वापर थांबणे यातील काहीच साध्य होणार नसल्याने हा निर्णय निरुपयोगी असल्याची टीका तज्ज्ञांकडून करण्यात आली.