शेतमजुरांवर काळाचा घाला
#नारायणगाव
विवाह सोहळ्याच्या पूर्वतयारीसाठी आपल्या गावाकडे चाललेल्या शेतमजुरांच्या दुचाकीला भरधाव वेगातील पिकअप टेम्पोने धडक दिल्यामुळे दोन दुचाकींवरील एकाच कुटुंबातील पाच जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाले. नगर-कल्याण महामार्गावर आळेजवळील लवणवाडी येथे सोमवारी (२७ मार्च) रात्री साडेनऊ वाजता ही दुर्घटना घडली. या भीषण अपघातातील मृतांमध्ये दोन चिमुरड्या मुलांचा समावेश आहे.
नगर-कल्याण महामार्गावर लवणवाडी इथे पिकअपने दोन दुचाकींसह आठ जणांना चिरडले. तीनही वाहने समोरासमोर धडकली. या अपघातात एका लहान मुलाचा आणि व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी झालेल्या सहा जणांपैकी आणखी तिघांचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन चिमुकल्यांसह २ पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे.
अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गंभीर जखमी असलेल्या तिघांवर उपचार सुरू असून पिकअप चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, पिकअप चालक मद्यधुंद अवस्थेत होता. स्थानिकांनी अपघातग्रस्तांना मदत करत रुग्णालयात पोहोचवले.
या भीषण अपघातात दुचाकीवरील नितीन मधे, सुंदरा ऊर्फ सुनंदा मधे, गौरव मधे, आर्यन मधे हे जागीच ठार झाले. तर सुहास ऊर्फ यमा मधे आणि अर्चना मधे हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी आळेफाटा येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी नगर येथे दाखल करण्यात आले. रोहित मधे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आळेफाटा पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला असून टेम्पोचालक मयूर संतोष आनंद (रा. कळस, ता. पारनेर) याला अटक केली आहे. पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर पुढील तपास करत आहेत.
feedback@civicmirror.in