स्वराज्य पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून आरटीओ चौकात आंदोलन
पुणे शहरात रस्त्यांची चाळण झाली आहे. शहरांतील रस्त्यांवर प्रचंड खड्डे पडले आहेत. मात्र, महापालिकेने याकडे पुर्णपणे दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील खड्डांविरोधात स्वराज्य पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहे. आज आरटीओ चौकातील खड्ड्यांची पूजा करत रांगोळ्या काढून निषेध व्यक्त करण्यात आला आहे.
रस्त्यांची चाळण झाल्यामुळे वाहनाधारकांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. खड्ड्यांमुळे आपला जीव मुठीत घेऊन गाडी चालवावी लागत आहे. त्यामुळे स्वराज्य पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यांवरील खड्ड्यांना पुष्पहार घालून निषेध व्यक्त केला. “हे खड्ड्या तुच देव आहेस, लोकांचा जीव वाचव, महापालिकेला याबाबत जाग येत नाही, तुच आमची काळजी घे रे बाबा”, “खड्डे बुजवा जीव वाचवा”, अशा प्रकारची घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करण्यात आला आहे.
आरटीओ चौकातील खड्ड्यांबाबत निषेध व्यक्त करताना खड्ड्यांमध्ये थोड्या सोडत फुलांचा पाकळ्या देखील टाकण्यात आल्या आहेत. आठ दिवसात खड्डे बुजवले नाही, तर महापालिका अधिकाऱ्यांच्या टेबलवर राडारोडा टाकण्यात येईल, असा इशारा यावेळी स्वराज्य पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून देण्यात आला आहे.