वारी २०२४: संत तुकाराम महाराज पालखी सोहळा उरळीतील विसावा टाळून पुढे मार्गस्थ

विसाव्याच्या जागेवरून ग्रामस्थ, पालखी सोहळा प्रमुखांमध्ये वादात संत तुकाराम महाराज पालखी सोहळा उरुळी कांचन येथे न थांबता पुढे मार्गस्थ झाला.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Thu, 4 Jul 2024
  • 02:47 pm

वारी २०२४: संत तुकाराम महाराज पालखी सोहळा उरळीतील विसावा टाळून पुढे मार्गस्थ

विसाव्याच्या जागेवरून ग्रामस्थ, पालखी सोहळाप्रमुखांमध्ये वाद, पालखी गावातूनच नेण्यासाठी ग्रामस्थ आग्रही

सुनील जगताप

विसाव्याच्या जागेवरून ग्रामस्थ, पालखी सोहळा प्रमुखांमध्ये वादात संत तुकाराम महाराज पालखी सोहळा उरुळी कांचन येथे न थांबता पुढे मार्गस्थ झाला.  

उरुळी कांचन ग्रामस्थांच्या प्रचंड विरोधामुळे पालखी  गावात न थांबता पुढे निघून गेली. ग्रामस्थांनी सुरुवातीला पुणे-सोलापूर रोडवर ठाण मांडत, भजन...किर्तन करीत ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर नगाऱ्याची बैलगाडी अडवून पालखी सोहळा आत नेण्यासाठी आग्रह धरला. पोलीस प्रशासनाला हाताशी धरलेल्या विश्वस्तांनी नगाराच्या बैलगाडीचे बैल सोडून पुणे-सोलापूर रोडवर नेले. त्यानंतर पोलिसांनी बैलगाडी स्वतः ओढत बैलांपर्यंत नेऊन पालखी पुणे-सोलापूर रोडवरूनच जाईल अशी भूमिका घेतली. त्यानंतर ग्रामस्थांनी पालखी गावातून जाणार नसेल तर आमच्या गावात थांबू नये अशी भूमिका प्रशासन, पालखी सोहळा प्रमुखांसमोर घेतली. 

संत तुकाराम महाराज पालखी सोहळा प्रमुखांपैकी एका विश्वस्ताच्या आडमुठ्या भूमिकेचा फटका दिंडी, पालखी सोहळ्यामधील वारकऱ्यांना बसला. गेल्या शंभर वर्षांपासून चालत आलेल्या परंपरेनुसार,संत तुकाराम महाराज पालखी सोहळा उरुळी कांचन गावातील मारुती मंदिरामध्ये विसावा घेत होता. दोन वर्षापासून पालखी सोहळा प्रमुख, ग्रामस्थांत विसाव्याच्या ठिकाणाबाबत मतभेद होत होते. त्यामुळे एक वर्ष पालखी सोहळा सोलापूर रोडवरच तळवाडी येथे थांबला. दुसऱ्या वर्षी पालखी सोहळा गावात येऊन मारुती मंदिरासमोर न थांबता महात्मा गांधी विद्यालयाच्या पटांगणावर विसाव्याला थांबला. चालू वर्षीही ग्रामस्थांचे म्हणणे तेच होते. त्यांनी पालखीच्या विसाव्यासाठी महात्मा गांधी विद्यालयाच्या पटांगणावर चोख बंदोबस्त, तयारी केली होती. ग्रामस्थांचे म्हणणे असे होते की, पालखी सोहळा उरुळी कांचन आश्रम रोडवरून बाजारपेठेतून महात्मा गांधी विद्यालयाच्या पटांगणावर जावा. तेथे विसावा घेतल्यानंतर नेहमीप्रमाणे पालखी सोहळा तळवाडीवरुन पुणे सोलापूर रोडवरील यवत मुक्कामासाठी रवाना व्हावा. मात्र या भूमिकेला पालखी सोहळा प्रमुख माणिक मोरे यांचा गेल्या दोन महिन्यांपासून विरोध होता आणि ते ग्रामस्थांच्या कोणत्याही विनंतीला प्रतिसाद देत नव्हते. अगदी मंगळवारी रात्री साडेअकरा पर्यंत लोणी येथील मुक्कामाच्या ठिकाणी, उरुळी कांचनचे जेष्ठ नेते के.डी.कांचन, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजाराम कांचन, महात्मा गांधी सर्वोदय संघाचे विश्वस्त संभाजी कांचन, सरपंच अमित कांचन, माजी सरपंच संतोष कांचन, भाऊसाहेब कांचन, राजेंद्र ब.कांचन यांच्यासह अनेकांनी विश्वस्तांची गाठ घेऊन, पालखी सोहळा नेहमीच्या पद्धतीने उरुळी कांचन येथे आणावा अशी भूमिका मांडली. या भूमिकेला माणिक मोरे यांनी प्रतिसाद दिला नाही आणि मी पालखीचा मालक आहे, मी ठरवीन पालखी कशी न्यायची अशी भूमिका घेतली. उलट पक्षी ग्रामस्थांना, तुम्ही अडवून बघा मी काय करतो ते अशाच पद्धतीची दमदाटीची भाषा वापरली. त्यामुळे बुधवारी उरुळी कांचनच्या नागरिकांनी जर पालखी सोहळा आश्रम रोडने महात्मा गांधी विद्यालयाच्या पटांगणावर जाणार नसेल, तर पालखी सोहळा आमच्या गावात थांबवू नये अशी भूमिका घेऊन, पालखी सोहळ्याला उरुळी कांचन येथे थांबण्यास अटकाव केला. 

महसूल, पोलीस प्रशासन पालखी सोहळा विश्वस्तांच्या मनमानीला बळी पडत लाखो भाविकांच्या संत तुकाराम महाराज यांच्यावरील श्रद्धेच्या, भावनेच्या आड आले. लाखो महिला संत तुकाराम महाराजांच्या पादुकांच्या दर्शनापासून वंचित राहिल्या. शिवाय पालखी सोहळ्यातील अश्व, नगाऱ्याच्या गाडीचे बैल, आणि पालखीच्या रथाचे बैल यांचेही प्रचंड हाल झाले. 

उरुळी कांचनमधील ग्रामस्थांनी महात्मा गांधी विद्यालयात विसाव्याच्या ठिकाणी  निषेध सभा घेऊन, पालखी सोहळा प्रमुख, विश्वस्त आणि विशेष करून माणिक मोरे यांचा निषेध केला आहे. सभेला उरुळी कांचनचे जेष्ठ नेते के.डी.कांचन, देविदास भन्साळी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजाराम कांचन, महात्मा गांधी सर्वोदय संघाचे विश्वस्त संभाजी कांचन, सरपंच अमित कांचन, माजी सरपंच संतोष कांचन, भाऊसाहेब कांचन, राजेंद्र ब.कांचन, दत्तात्रय शां.कांचन,माजी उपसरपंच युवराज कांचन,भाऊसाहेब तुपे, अलंकार कांचन, शरद वनारसे यांच्यासह प्रचंड संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

या सर्व प्रकारामुळे इतिहासात पहिल्यांदाच संत तुकाराम महाराज पालखीला उरुळी कांचनमधून स्वागताविना पुढे जावे लागले. सोहळा प्रमुखांच्या या भूमिकेचा उरुळी कांचन मधीलच नव्हे तर पंचक्रोशीतील तमाम नागरिकांनी तीव्र शब्दात निषेध करून, अशा पद्धतीने पालखी सोहळा चालवण्याच्या पद्धतीला आक्षेप घेतला आहे.

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest