आतकरवाडी गावात स्मशानभूमी नाही, नागरिकांनी केले रस्त्यावरच अंत्यसंस्कार
पुणे जिल्ह्यातील आतकरवाडी गावातील भीषण वास्तव समोर आले आहे. गावामध्ये स्मशानभूमी नसल्याने गावकऱ्यांवर मृताचे अंत्यसंस्कार रस्त्यावर करण्याची वेळ ओढवली आहे. गावामध्ये समशानभूमी नाही, त्यातच पाऊस सुरू असल्याने ओढ्याला पाणी आले. त्यामुळे, चितेवर आसरा म्हणून लाकडी खांब उभे करून त्यावर पत्रे टाकुन गावकऱ्यांनी रस्त्यावर अंत्यविधी केला आहे.
घेरा-सिंहगड ग्रामपंचायत हद्दीत आज सकाळी मुसळधार पाऊस पडल्याने आतकरवाडी येथील एका व्यक्तीवर मुख्य रस्त्यावर अंत्यसंस्कार करावे लागले. सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या आतकरवाडीत स्मशानभूमी नसल्याने ओढ्यालगत शेताच्या बांधावर छोट्याशा जागेत अंत्यसंस्कार केले जातात. परंतु, पावसाळयात ओढ्याला जास्त पाणी असते. त्यावेळी तेथे पोचणे शक्य होत नाही. त्यामुळे, रस्त्यावर अंत्यसंस्कार करण्याशिवाय पर्याय नसतो.
आज पाऊस आणि ओढ्याचे पाणी कमी होण्याची वाट पाहावी लागते. अखेर तीन तासानंतर अखेर ग्रामस्थांनी भर पावसातच चितेवर आसरा म्हणून लाकडी खांब उभे करून त्यावर पत्रे टाकुन अंत्यविधी करण्याचा निर्णय घेतला.