संग्रहित छायाचित्र
पूर्वजांचे व या मातीचे स्मरण माझ्या मनात कायम आहे. कणेरसरसारखे सुरेख व सौंदर्यपूर्ण गाव क्वचितच दिसते. दररोज सकाळी मी आपल्या परंपरेची निष्ठापूर्वक पूजा करतो. आपली परंपरा, पूर्वजांची पुण्याई आणि यमाई देवीच्या कृपेमुळेच मी भारताचा सरन्यायाधीश होऊ शकल्याची कबुली रविवारी (२० ऑक्टोबर) सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड (Chief Justice Dhananjay Chandrachud) यांनी दिली आहे.
पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील कणेरसर (Kanersar) या मूळ गावाला सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी भेट दिली; तसेच यमाई देवीचे (Yamai Devi) दर्शन घेतले. त्यानंतर ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना चंद्रचूड बोलत होते. अयोध्येच्या वादावर शेकडो वर्षे कोणालाही तोडगा काढता आला नाही. हा खटला आमच्याकडे आल्यावर तीन महिने विचार करत होतो; परंतु त्यातून मार्ग निघत नव्हता. शेवटी मी पूजा करताना भगवंताकडे ‘तुम्हीच मार्ग शोधून द्या’, असे म्हटले. आपला विश्वास व आस्था असेल, तर देव मार्ग शोधून देतो’, अशा शब्दांत सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी अयोध्येतील श्रीरामजन्मभूमी खटल्याच्या ऐतिहासिक निकालावर भाष्य केले. सरन्यायाधीशांनी अयोध्येच्या खटल्याच्या निकालाचा तोडगा देवानेच सुचविल्याचे सांगितले.‘अनेक वेळा न्यायालयीन कामकाजात तोडगा, पर्याय सुचत नाही. अयोध्येचा खटला आमच्यापुढे आला, त्यावर तीन महिने विचार करीत होतो. शेकडो वर्षे या वादावर कोणी तोडगा काढला नव्हता. त्यातून मार्ग कसा शोधायचा, हे आम्हाला कोणालाही ठावूक नव्हते. दैनंदिन पूजा करताना मी भगवंताकडे या प्रकरणी मार्ग शोधून देण्यास सांगितले. आपला विश्वास व आस्था असेल, तर देव नेहमी मार्ग शोधून देतात’, असे ते म्हणाले.
स्त्री सक्षमीकरणाची प्रेरणा माझ्या आईने दिली. माझ्या पणजीने नऊ मुलांना कणेरसरहून पुण्यात आणले. तिने आपले सगळे दागिने विकून मुलांना शिकविले. माझी पत्नी कल्पना दास स्त्री सशक्तीकरणासाठी दररोज कार्यरत आहे. आम्ही दोन विशेष मुलींना दत्तक घेतले असून, त्यांच्यामुळे मला जीवनाचे अनेक पैलू कळले. एका महिलेमुळे संपूर्ण कुटुंबाचे परिवर्तन होते’, असेही सरन्यायाधीश म्हणाले.सर्वोच्च न्यायालयात मागील आठ वर्षे काम करताना स्त्री सशक्तीकरणावर प्रामुख्याने भर दिला. माझ्या निर्णयामुळेच भारतीय लष्करात महिलांना कायमस्वरूपी नियुक्ती मिळाली. चीन-पाकिस्तानच्या सीमेवर महिला देशाचे रक्षण करीत आहेत. हवाई दलात लढाऊ वैमानिक, नौदलात पाणबुडी आणि युद्धनौकांवर महिला कार्यरत आहेत. देश बदलत असताना, सर्वांनी महिलांना सशक्तीकरणासाठी वाव द्यावा’, असे आवाहनही सरन्यायाधीशांनी यावेळी केले.