संग्रहित छायाचित्र
मुसळधार पावसामुळे शहरात अनेक ठिकाणी पूरजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले आहे. तसेच सर्वच राजकीय पक्षांकडून महापालिका आयुक्तांनी निवेदन दिले जात असून पावसाळापूर्व कामावर टीका केली जाऊ लागली आहे. त्यामुळे आता आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी परिमंडळ उपायुक्त, क्षेत्रीय अधिकारी, पथ विभाग, ड्रेनेज विभाग, आपत्ती व्यवस्थापन विभागाची बुधवारी (दि. ११) तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत केलेल्या कामांचा आढावा घेतला जाणार असून अहवाल सादर करण्यास सांगण्यात येणार असून आयुक्तांकडून अधिकाऱ्यांची कानउघडणी केली जाणार असल्याचे कळते.
पावसाळापूर्व कामे ९० टक्के झाल्याचा दावा महापालिका आयुक्तांनी केला होता. तसेच जास्त पाऊस झाल्याने पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती, असेही सांगितले होते. तसेच शहरात मागील वर्षी पाणी साठलेल्या ठिकाणी पुन्हा पाणी साचणार नाही, असा दावा केला होता. मात्र, महापालिका आयुक्तांच्या या दाव्यावर शहरात गेल्या दहा दिवसात दोन वेळा सर्वदूर साचलेल्या पावसाच्या पाण्याने पाणी फेरले गेले आहे. त्यानंतर, महापालिकेच्या कारभारावर मोठ्या प्रमाणात टीकेची झोड उठल्याने अखेर आयुक्तांनी ही स्थिती गांभीर्याने घेत केलेल्या पावसाळापूर्व कामांचा आढावा घेण्यासाठी बैठक बोलावली आहे. या बैठकीत पावसाळापूर्व कामे करूनही पाणी का साचले ? नेमकी कारणे काय ? उपाययोजना का झाल्या नाहीत ? आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा नेमकी कुठे होती याचा अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले असून आयुक्तांवर त्यावर झाडाझडती घेणार आहेत.