पुण्याच्या भूमिपुत्राला कारगिलमध्ये वीरमरण, भवानी पेठेत पार पडले अंत्यसंस्कार
पुण्यातील भवानी पेठेत राहणारे जवान दिलीप ओझरकर कारगिल ते लेह दरम्यान प्रवास करताना शहीद झाले आहेत. सराव मोहिमेसाठी जात असताना ३ सप्टेंबर रोजी रविवारी दुपारी ३ वाजता त्यांच्या गाडीचा दुर्दैवी अपघात झाला होता. यात ते शहीद झाले. आज त्यांच्यावर पुण्यातील भवानी पेठेत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.
जवान दिलीप ओझरकर हे १५ एप्रिल २००४ रोजी देशसेवेत रुजू झाले होते. देशसेवेत ते हवालदार या पदावर होते. साधारण दीड ते दोन वर्षापूर्वीच सेवेतून ते निवृत्त ही झाले होते. मात्र, त्यांनी पुन्हा कालावधी वाढवून देशसेवा करण्यास पसंती दिली.
कालावधी वाढवून मिळाल्यानंतर सराव मोहिमेसाठी जात असताना ३ सप्टेंबर रोजी त्यांच्या गाडीचा दुर्दैवी अपघात झाला आणि यात ते शहीद झाले. त्यानंतर त्यांचे पार्थिव रात्री उशिरा पुण्यात आणण्यात आले होते. आज पहाटे त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव तसेच जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार पार पडले आहेत.