संग्रहित छायाचित्र
पुण्याच्या लोणावळ्यामध्ये सलग तिसऱ्या दिवशी विक्रमी पाऊस झाला आहे. गेल्या २४ तासांमध्ये लोणावळ्यात तब्बल २७३ मिलीमीटर पाऊस कोसळला आहे. तर तीन दिवसांत तब्बल ७०५ मिमी पाऊस कोसळला आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्याच्या घाट आणि दुर्गम भागातील शाळा, अंगणवाड्यांना अतिवृष्टीमुळे आज, उद्या सुटी जाहीर करण्यात आली आहे. यामुळे या निर्णयामुळे आंबेगाव, खेड, जुन्नर, मावळ, पुरंदर, वेल्हे आदी भागांतील ३५५ शाळा आज आणि उद्या बंद राहणार आहेत.
थंड हवेचे ठिकाण असलेल्या लोणावळ्यात यंदाच्या मोसमातील सलग तिसऱ्या दिवशी विक्रमी पाऊस कोसळला आहे. गेल्या २४ तासांत येथे तब्बल २७३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर तीन दिवसांत तब्बल ७०५ मिमी पाऊस कोसळला आहे. असे असले तरी यंदा आत्तापर्यंत झालेला पाऊल हा गेल्या वर्षीच्या तुलनेत कमीच आहे. गेल्या वर्षी आजच्या तारखेपर्यंत २६२२ मिमी पाऊस बरसला होता. यंदा मात्र केवळ २०१७ मिमी इतकाच पाऊस कोसळला आहे.
लोणावळ्यातील सहारा ब्रिज याठिकाणी असलेले टाटा धरण हेदेखील ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे. तसा इशारा संबंधित टाटा धरण अधिकाऱ्यांनी दिला आहे. टाटा धरणाचं पाणी हे इंद्रायणी नदीत सोडण्यात येतं. त्यामुळे इंद्रायणी नदीकाठच्या रहिवाशांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
तसेच पुणे जिल्ह्याच्या घाट आणि दुर्गम भागातील शाळा, अंगणवाड्यांना अतिवृष्टीमुळे आज, उद्या सुटी जाहीर करण्यात आली आहे. मात्र आज शाळेत आलेल्या मुलांना सुरक्षितपणे घरी सोडता येण्यासाठी शिक्षक आणि मुख्याध्यापकांनी शाळेत जाणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी ही माहिती दिली. या निर्णयामुळे आंबेगाव, खेड, जुन्नर, मावळ, पुरंदर, वेल्हे आदी भागांतील ३५५ शाळा आज आणि उद्या बंद राहणार आहेत.