आळंदीतील भक्त पुंडलिकाचे मंदिर पाण्याखाली, संततधार पावसामुळे पाणीपातळीत वाढ
सोमनाथ साळुंके
गेल्या आठवडाभरापासून संततधार सुरू असलेल्या पावसामुळे इंद्रायणी नदीपात्रात पाण्याची वाढ होऊन पाण्याने धोक्याची पातळी ओलांडली असून श्री संत भक्त पुंडलिकाचे मंदिर पाण्याखाली गेले आहे. नदीपात्रालगत पोलीस बंदोबस्त नसल्याने येथील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
गेल्या आठवडा भरापासून शहरासह ग्रामीण भागात देखील दमदार हजेरी लावल्यामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण दिसून येत असले तरी पण जनजीवन विस्कळित झाल्याचे दिसून येत आहे.काही दिवसापासून हजेरी लावलेल्या पावसामुळे श्री क्षेत्र आळंदी भागातील इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याचे चित्र दिसून येत आहे.वाहतुकीचा प्रश्न मार्गी लागावा या उद्देशाने श्री क्षेत्र आळंदी भागाकडे जाण्यासाठी एका पुलासह इतरत्र दोन पुल बांधण्यात आले असून येथील चाकण चौकातील नव्या पुलांनजीक असलेला बंधारा हा पूर्णपणे पाण्याखाली गेला असून मंदिराकडे जाण्यासाठी पादचारी नागरिकांसाठी बांधण्यात आलेला पादचारी पुल देखील पाण्याखाली गेला आहे.याचबरोबर नदीकिनारी असलेले श्री संत भक्त पुंडलिकाचे मंदिर देखील पाण्यात बुडाले असून मंदिराच्या कळसाचे भाविकांना दर्शन घेण्याची वेळ येत आहे. नदीपात्रात पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने नदीने धोक्याची पातळी ओलांडली असताना देखील या ठिकाणी आळंदी व दिघी पोलीस स्टेशनच्या वतीने नदीपात्रातील घाटावर कोणत्याही प्रकारचा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात पोलीस यंत्रणा असमर्थ ठरल्याने या भागातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
गेल्या अनेक वर्षापासून नदीच्या घाटावर अनेक बेवारस नागरिक ठाण मांडून असल्याचे चित्र नेहमीच परिसरात पाहायला मिळत आहे. त्यामुळे आणखी जर पाण्याच्या पातळीत वाढ होऊन गंभीर स्वरूपाची या ठिकाणी दुर्घटना घडली तर यास जबाबदार कोण? राहणार असा सवाल नागरिकांकडून व्यक्त होत आहे. या ठिकाणी दोन्ही बाजूस असणाऱ्या घाटावरील मंडपाजवळ येण्याची पातळी पाण्याने गाठली आहे. अनेकदा येथील घाटावर पावसाच्या पाण्याचा अंदाज न आल्याने यापूर्वी देखील बहुतांश प्रमाणात अनेक नागरिक पाय घसरून पाण्याच्या प्रवाहात वाहून जाण्याच्या दुर्घटना घडून देखील झोपी गेलेली पोलीस यंत्रणेने सतर्कता दाखविण्याची ही योग्य वेळ असताना देखील परिसरात अद्याप देखील पोलीस यंत्रणा सज्ज न झाल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
सध्या पंढरपूरच्या वारीवरून परतीच्या मार्गावर असलेले वारकऱ्यांची तोबा गर्दी माऊलींच्या दर्शनासाठी दिसून येते. अनेक वारकरी हे नदीपात्रात अंघोळ अथवा हातपाय धुण्यासाठी उतरत असल्याने येथे पाण्याचा अंदाज न आल्याने एखाद्या दुर्घटनेची शक्यता नाकारता येत नाही. यापूर्वीच पडणाऱ्या संततधार पावसामुळे प्रशासनाच्या वतीने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. परिसरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाच्या वतीने नदीच्या दोन्ही पात्रालगत असलेल्या घाटावर पोलीस बंदोबस्त ठेवण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.