नितीन गडकरी यांच्या हस्ते अनावरण
भारताने तीन महिन्यांपूर्वी जपानला पिछाडीवर टाकून वाहन उद्योग क्षेत्रात अमेरिका आणि चीनपाठोपाठ तिसरा क्रमांक मिळवला आहे. मी मंत्रिपदाची सूत्रे स्वीकारली, तेव्हा देशातील वाहन उद्योग जगात सातव्या क्रमांकावर होता. तो आज तिसऱ्या क्रमांकावर आला असून, येत्या पाच वर्षांत वाहन उद्योग क्षेत्रात भारत दुसऱ्या क्रमांकावर असेल, असा विश्वास केंद्रीय रस्ते, दळणवळण व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी व्यक्त केला.
‘बजाज ऑटो’च्या आकुर्डी येथील प्रकल्पात कंपनीने विकसित केलेल्या जगातील पहिल्या सीएनजी मोटारसायकलचे अनावरण नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. कंपनीचे अध्यक्ष नीरज बजाज, व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव बजाज, संचालक अनामी रॉय, कार्यकारी संचालक राकेश शर्मा आदी उपस्थित होते. ‘वाहन निर्मिती उद्योग हे देशाचे ‘ग्रोथ इंजिन’ असून, त्याचा आकार २० लाख कोटी रुपये एवढा आहे. आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार करत देशाची अर्थव्यवस्था पाच लाख कोटी डॉलरवर नेण्याचे उद्दिष्ट गाठण्याच्या मोहिमेत या उद्योगाचे मोठे योगदान असणार आहे. या उद्योगातून वस्तू व सेवा करापोटी (जीएसटी) तीन लाख कोटी रुपये केंद्र व राज्य सरकारकडे जमा होतात, तसेच आतापर्यंत चार लाख रोजगार निर्माण केले आहेत. त्यामुळे हा संपत्ती व रोजगार निर्माता उद्योग असून, त्यातून सामाजिक-आर्थिक परिवर्तन होत आहे, असे गडकरी म्हणाले.
पेट्रोल-डिझेलची आयात २० लाख कोटी रुपयांवर
पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनाची आयात २० लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. पर्यायी इंधनावर आधारित वाहनांची निर्मिती केल्यास ही आयात कमी होईल, तसेच देश प्रदूषणमुक्त होईल. वायू, जल आणि ध्वनिप्रदूषण हे देशात चिंतेचे विषय असून, पेट्रोलवरील वाहनाला प्रतिकिलोमीटर सव्वा दोन रुपये खर्च येतो, तर सीएनजी वाहनाला प्रतिकिलोमीटर एक रुपया एवढा कमी खर्च येतो. त्यामुळे पैशांची बचत होते, पर्यावरणाचे जतन होते, तसेच आयातही कमी होते, असेही गडकरी यांनी नमूद केले.