महात्मा गांधी स्मारक रखडले, काँग्रेसचे सत्याग्रह आंदोलन
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पावन स्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक वास्तूंचे जतन व संवर्धन करण्यास पिंपरी-चिंचवड महापालिका कुचराई करत असल्याच्या निषेधार्थ शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने पिंपरीतील मोरवाडी चौकात बुधवारी (दि. २) सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. या वास्तूंचे महापालिकेने जतन करण्याची मागणी आंदोलकांनी केली.
या सत्याग्रह आंदोलनात माजी महिला अध्यक्षा श्यामला सोनवणे, बिंदू तिवारी, भाऊसाहेब मुगुटमल, अमर नाणेकर, मयूर जयस्वाल, ॲड. अनिरुद्ध कांबळे, माउली मलशेट्टी, विश्वनाथ जगताप, विठ्ठल शिंदे, सोमनाथ शेळके, हिरामण खवळे, जार्ज मॅथ्यू, गौरव चौधरी, वाहब शेख, बाबासाहेब बनसोडे, डॉ. मनीषा गरुड, अरुणा वानखेडे, ॲड. संकल्पा वाघमारे, अबूबकर लांडगे, गणेश गरड, मिलिंद फडतरे, गौतम ओव्हाळ, सतीश भोसले, वसंत वावरे, विशाल कसबे, राजन नायर, भीमराव जाधव, आवेज सय्यद, साजिद खान व शहर काँग्रेसचे सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. पिंपरी-चिंचवड महापालिका वतीने पिंपरी येथे महात्मा गांधी यांचे भव्य स्मारक उभारण्यासाठी १९ जून २०१९ रोजी स्थायी समितीचा ठराव क्रमांक ४८७९ व ७ सप्टेंबर २०१९ रोजीच्या सर्वसाधारण सभेतील विषय क्रमांक ६ ला मान्यता देण्यात आली होती. आदित्य बिर्ला ग्रुपच्या माध्यमातून हे स्मारक उभारण्यात येणार होते. स्मारकासाठी मंजुरी मिळून पाच वर्ष झाली आहेत. तरीपण या जागेवर महापालिकेच्या वतीने महात्मा गांधीचे स्मारक उभारण्यात आलेले नाही. 'चले जाव' आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महात्मा गांधी यांना अटक करून पुण्यात आणण्यात येत होते. त्यावेळी जनक्षोभ उसळू नये यासाठी महात्मा गांधी यांना चिंचवड रेल्वे स्थानकावर उतरवण्यात आले. ९ ऑगस्ट १९४२ रोजी महात्मा गांधींना पिंपरी येथील सर्वे क्रमांक २३, २४,२५ या वास्तूवर काही काळ थांबवण्यात आले होते. ती वास्तू म्हणजे मागील भागात जो जुन्या पद्धतीचा बंगला दिसत आहे. हीच वास्तू शहराचा ऐतिहासिक ठेवा आहे.