संग्रहित छायाचित्र
पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरण क्षेत्र परिसरात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे पवना धरण ओव्हरफ्लो झाले आहे. धरण ओव्हरफ्लो झाल्यामुळे सध्या पवना धरणातून ३५०० क्यूसेक वरून पाण्याचा विसर्ग वाढवून ५६०० क्यूसेक्स करण्यात आला आहे. त्यामुळे पवना नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
पवना धरण पूरनियंत्रण कक्षाने दिलेल्या माहितीनुसार, पवना धरणाच्या विज निर्मीती ग्रूहाद्वारे १४०० क्यूसेक्स व सांडव्यावरून २१००० क्यूसेक्स असा एकुण ३५०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग पवना नदीमध्ये सुरू होता. मात्र, आता तो वाढवून दुपारी २ नंतर ५६०० क्यूसेक्स करण्यात आला आहे. तसेच आवश्यकतेनुसार बदल संभवू शकतो. याशिवाय, पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानूसार विसर्ग पुन्हा कमी / जास्त करण्याची शक्यता आहे, असल्याची माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेला पाऊस पुन्हा सुरू झाल्याने मावळमधील बळीराजा देखील सुखावला आहे. पावसाने दडी मारल्यामुळे मावळमधील भात शेती संकटात सापडली होती. परंतु, पुन्हा वरून राजा कोसळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये मात्र आनंद आहे. आज पुण्यासह पिंपरी चिंचचवड आणि जिल्हाभरात पावसाची जोरदा बॅटिंग सुरू आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.