पयार्वरण रक्षणासाठी शहरातील व्यापारी सरसावले
विशाल शिर्के
vishal.shirke@civicmirror.in
TWEET@vishal_mirror
वापरल्यानंतर निकामी झालेले किंवा नादुरुस्त मोबाईल, फ्रीज, लॅपटॉप, टीव्ही, केबल, वॉशिंग मशिन, डिजिटल कॅमेरे घरी कोठे ठेवायचे हा जटील प्रश्न असतो. याचे नेमके काय करायचे हे सूचत नसल्याने या वस्तू घरात पडून राहतात. या इलेक्ट्रॉनिक वस्तू जशा पर्यावरणाला घातक ठरतात, तशाच चुकीच्या पद्धतीने हाताळल्यास अपघातही घडू शकतो. अशा वस्तू निकामी करण्यासाठी पुण्यातील व्यापाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. ई-वेस्ट निकामी केल्यानंतर येणाऱ्या पैसे गरीब रुग्णांच्या उपचाराचा खर्च भागवण्यासाठी वापरले जाणार आहेत. .
पुणे व्यापारी महासंघ आणि लायन्स क्लब इंटरनॅशनलने हा उपक्रम हाती घेतला आहे. पर्यावरणाचे रक्षण हा हेतू तर आहेच. शिवाय यातून मिळणाऱ्या पैशातून गरीब रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत.
ई-वेस्ट गोळा करण्यासाठी येत्या शनिवारी (दि.११ फेब्रुवारी) स्पर्धाही आयोजित केली आहे. शहरातील २२ विविध भागांत ई-वेस्ट संकलन केंद्र सुरू करण्यात येणार आहे. जास्तीत जास्त ई-वेस्ट गोळा करणाऱ्या संघटनेला ११ हजार, दुसऱ्या क्रमांकासाठी ८ आणि तिसऱ्या क्रमांकासाठी ५ हजारांचे बक्षिस ठेवले असून या कामगिरीसाठी विशेष प्रशस्तिपत्रक दिले जाईल.
ई-वेस्टमध्ये काय काय काय येते ?
ई-वेस्टमध्ये मोबाईल फोन, लॅपटॉप, रेफ्रिजरेटर, केबल, वॉशिंग मशीन, स्पीकर, टीव्ही, डिशवॉशर, मायक्रोफोन, माइक्रोवेअर, टेपरेकॉर्डर, हेडफोन, प्रिंटर्स, चार्जर, म्युझिक सिस्टिम, पेनड्राईव्ह, डिजिटल कॅमेरा, एअर-कंडिशनर्स इत्यादी वस्तू स्वीकारल्या जाणार आहेत. नागरिकांनी निश्चित केलेल्या संकलन केंद्रावर जास्तीत जास्त ई-वेस्ट जमा करावी असे आवाहन व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फतेचंद रांका आणि सचिव महेंद्र पितळीया यांनी केले आहे.
याबाबत पुणे व्यापारी महासंघाचे सचिव महेंद्र पितळीया म्हणाले की, शहरातील अनेक दुकानदारांना, नागरिकांना ई-वेस्टची विल्हेवाट नक्की कशी लावावी हे समजत नाही. तसेच, ई-वेस्टमधील अनेक घटक पर्यावरण आणि मानवी आरोग्यासाठी घातक असतात. त्यामुळे त्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावणे आवश्यक आहे. लायन्स क्लबच्या माध्यमातून गोळा होणारे ई-वेस्ट सरकारमान्य कंपनीला देण्यात येईल. ती कंपनी त्याची योग्य विल्हेवाट लावेल. यातून मिळणारा पैसा लायन्स क्लब गरीबांच्या उपचारावर खर्च करणार आहे. येत्या शनिवारची ही चळवळ यशस्वी झाल्यास, ती पुढे निरंतर राबविण्यात येईल.