‘एक उम्मीद अचानक सी जग गई...’
प्रसन्नकुमार केसकर / चैत्राली देशमुख
"मैं बहुत खुश हूँ. एक उम्मीद अचानक सी जग गई. मुझे सबसे पहले अपने बूढ़े माँ और पिता को मिलना है और परिवार के साथ समय बिताना है अपने गांव जाकर. उसके बाद फिर सोचूंगा आगे क्या करना है."
सर्वोच्च न्यायालयाने अल्पवयीन असल्याच्या कारणावरून राठी हत्याकांडातील मुख्य आरोपी नारायण चेतनराम चौधरीची फाशीची शिक्षा माफ केली होती. तसेच तातडीने सुटका करण्याचे आदेश दिले होते. नागपूर मध्यवर्ती
कारागृहातून बाहेर पडताना 'सीविक मिरर'ने त्याच्या भावना जाणून घेण्यासाठी मंगळवारी सायंकाळी संपर्क साधला.
मंगळवारी दुपारीच नारायणचा भाऊ त्याला घेण्यासाठी तुरुंगाबाहेर थांबला होता. नारायणने आपल्या भावाला तुरुंगाबाहेर उभे असलेले पाहिले तेव्हा तो त्याच्याकडे धावला आणि त्याला घट्ट मिठीत घेतले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नारायण रात्री नागपुरातच राहणार असून त्याचे नातेवाईक बुधवारी पोहोचणार आहेत. त्यानंतर, ते त्याला राजस्थानमधील त्यांच्या मूळ गावी घेऊन जाणार आहेत.
नागपूर मध्यवर्ती कारागृहाचे कारागृह अधीक्षक अनुपकुमार कुमरे यांनी सीविक मिररशी बोलताना सांगितले, " गेल्या २८ वर्षांपासून पुणे आणि नागपूर येथील कारागृहात बंदिस्त असलेल्या नारायणला पुणे जिल्हा न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर त्याला कैदी क्रमांक सी-७४३२ देण्यात आला होता."
नारायणच्या वागणुकीबद्दल कुमरे म्हणाले, "नारायण हा सहकार्य करणारा तसेच चांगली वर्तणूक असणार कैदी होता. तुरुंगातील शिस्त राखण्यासाठी तो येथील कर्मचाऱ्यांना मदत करायचा. सुटकेची बातमी ऐकून त्याला खूप आनंद झाला आणि अश्रू अनावर झाले. तो मंगळवारी दिवसभर अस्वस्थ होता आणि तुरुंगातून सुटका होण्याची औपचारिकता पूर्ण होण्याची वाट पाहात होता."
कुमरे पुढे म्हणाले, “अटक होण्यापूर्वी नारायण कमी शिकलेला असला तरी, तुरुंगात असताना नारायणने शिक्षण घेतले. नागपूरला हलवण्यापूर्वी येरवडा मध्यवर्ती कारागृहात असताना त्याने इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठातून बी ए पूर्ण केले. पुढे, नागपूर कारागृहात त्याला आणल्यानंतर, त्याने समाजशास्त्रात पदव्युत्तर पदवी पूर्ण केली. गेल्या वर्षी २०२२ मध्ये त्याने पुन्हा एकदा राज्यशास्त्रात एमए करण्यासाठी विद्यार्थी म्हणून नोंदणी केली होती. त्याने राज्यशास्त्रात एमएचे पहिले वर्ष पूर्ण केले आहे. याशिवाय, त्याने तुरुंगातील कैद्यांना दिलेला गांधीवादी तत्त्वज्ञानाचा अभ्यासक्रमही यशस्वीपणे केला आहे."
नारायणच्या सुटकेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर, त्याचे वकील श्रेया रस्तोगी आणि हर्षद निंबाळकर यांनी मंगळवारी पुण्यातील जिल्हा व सत्र न्यायालयात धाव घेतली आणि न्यायालयाने तुरुंग प्रशासनाला सुटकेच्या आदेशाची कल्पना दिली. संध्याकाळच्या सुमारास न्यायालयाने आदेश जारी केले. आधीच नागपुरात पोहोचलेल्या वकिलांच्या आणखी एका पथकाने सकाळी कारागृह अधिकाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची प्रत दिली. पुणे कोर्टाने सुटकेचा आदेश जारी करताच, तो नागपूर तुरुंग अधिकाऱ्यांना मेल करण्यात आला. अधिकाऱ्यांनी संध्याकाळी ७ च्या सुमारास नारायणची सुटका केली. गेल्या २८ वर्षांत त्याने प्रथमच जग पाहिले.
अंगाचा थरकाप उडवणाऱ्या राठी कौटुंबिक हत्याकांडातील दोषी आणि फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेला आरोपी खुनाच्या वेळी अवघा १२ वर्षांचा होता, या युक्तिवादावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब करताना त्याची तत्काळ सुटका करण्याचे आदेश दिले होते. फाशीच्या शिक्षेवेळी चौधरी २२ वर्षांचे असल्याचे दाखवण्यात आले होते.
न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस, केएम जोसेफ आणि हृषिकेश रॉय यांच्या खंडपीठाने सोमवारी त्यांचा किशोरवयाचा दावा खरा असल्याचा निष्कर्ष काढून त्यांची सुटका करण्याचे आदेश दिले.
चौधरी याने १९९४ मध्ये राठी कुटुंबातील दोन मुले, एक गरोदर महिला आणि कुटुंबातील घरकामगार यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी एकूण २८ वर्षे तुरुंगवास भोगला आहे.
मीराबाई राठी (४५ ), तिची सून बबिता (२५), नीता राठी (२२ ), अविवाहित मुलगी प्रीती (१९ ), विवाहित मुलगी हेमलता नावंदर (२७ ), बबिता यांचा अडीच वर्षांचा मुलगा चिराग, हेमलता यांचा दीड वर्षांचा मुलगा, घरकाम करणारी सत्यभामाबाई सुतार (४२ ) यांची हत्या करण्यात आली होती. २६ ऑगस्ट १९९४ रोजी कोथरूड येथील हिमांशू अपार्टमेंट, शिलाविहार कॉलनी, पौड फाटा येथील फ्लॅटमध्ये ही घटना घडली होती.