गाद्या + गिरद्या + पलंग = तुरुंग
विजय चव्हाण
महाराष्ट्रातील कारागृहातील ५० वर्षांवरील कच्चे कैदी आता झोपण्यासाठी उशा आणि पलंगाचा वापर करू शकणार आहेत.
आत्तापर्यंत तुरुंगात कैद्यांना झोपण्यासाठी ताडपत्री किंवा चादर दिली जात होती. मात्र, आता या परंपरेत बदल करण्यात आला असून, आता कच्च्या कैद्यांना उशी आणि बेड दिला जाणार आहे.
तुरुंग महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांनी मंगळवारी हा निर्णय जाहीर केला. हे साहित्य कैद्यांना स्वखर्चाने आणावे लागणार आहे. वर्षानुवर्षे चालत आलेला तुरुंगाचा नियम गुप्ता यांनी बदलला आहे. ‘‘अनेक कैदी विविध आजारांनी ग्रस्त आहेत. त्यांना रात्री नीट झोप येत नाही. याची दखल घेत अमिताभ गुप्ता यांनी ५० वर्षांवरील कच्च्या कैद्यांसाठी स्वखर्चाने तुरुंगात उशी आणि गादी वापरण्याचा आदेश जारी केला. त्यांचा आकारही त्यांनी निश्चित केला आहे.’’ अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
महाराष्ट्रात ५० वर्षांवरील साडेतीन ते चार हजार कैदी आहेत. पुरेशी झोप न मिळाल्यास सामान्य माणसाची चिडचिड होते, असे गुप्ता यांचे मत आहे. होमगार्डचे डीजी डॉ. भूषण उपाध्याय हेही दीर्घकाळ जेलचे अतिरिक्त डीजी होते. त्यांनी सांगितले की, जर एखादा कैदी खूप आजारी असेल आणि कारागृहाच्या डॉक्टरांनी शिफारस केली असेल तर अशा कैद्यांना कारागृहात बेड दिला जातो.
कैद्यांच्या हितासाठी आणखी एक पाऊल
गेल्या आठवड्यात तुरुंग महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांनी आणखी महत्त्वाचा निर्णय घेतला. ‘ज्या कैद्यांचे वकील त्यांना तुरुंगात वैयक्तिकरित्या भेटू शकत नाहीत, अशांना आता महिन्यातून दोनदा कारागृहातून आपल्या वकिलांशी १० मिनिटे फोनवर बोलता येईल,’ असा आदेश त्यांनी जारी केला. त्याचबरोबर ‘ज्या कैद्यांच्या कुटुंबीयांना वैयक्तिक भेट घेणे शक्य होत नाही, अशा कैद्यांना त्यांच्या कुटुंबीयांशी महिन्यातून तीनदा कारागृहात बसवण्यात आलेल्या कॉईन बॉक्स क्रमांकावरून १० मिनिटे बोलता येणार आहे.’ कैद्यांचा ताण थोडा कमी व्हावा म्हणून हा निर्णय घेण्यात आला.
कैद्यांचे जीवनमान सुधारण्याची तयारी
कैद्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी कारागृह प्रशासनाने शिक्षा झालेल्या कैद्यांना त्यांच्या शहराजवळील कारागृहात हलविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. अनेक कैद्यांच्या कुटुंबीयांनी तक्रार केल्यानुसार, त्यांना कुटुंबातील सदस्य किंवा सहकाऱ्याला भेटण्यासाठी लांबचा प्रवास करावा लागतो.