बालेवाडीच्या शाळेतील सुिवधांसाठी आता आमरण उपोषण
सीविक मिरर ब्यूरो
बालेवाडी येथील मनपा शाळेतील शिक्षक, कर्मचारी आणि अपुऱ्या सुविधांच्या विरोधात दाद मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने गुरुवारी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. मात्र लाक्षणिक उपोषण करूनही शाळेला सुविधा देण्याबाबत टाळाटाळ होत असल्यामुळे संघटनेने आमरण उपोषण सुरु केले आहे. यासंदर्भात १० फेब्रुवारीला 'सीविक मिरर'ने 'स्मार्ट धूळधाण' या शीर्षकाखाली या समस्येला वाचा फोडली होती.
येथील मनपा शाळा क्रमांक १५२ व १२१ कै. बाबुराव गेनुजी बालवडकर शाळेत जवळजवळ १६०० पटसंख्या असूनही प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. या संदर्भात शिक्षण विभागाला वारंवार निवेदन देऊनही फरक पडत नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने गुरुवारी एक दिवसीय लाक्षणिक उपोषणाला सुरुवात करण्यात आली. मात्र प्रशासनाने दखल न घेतल्यामुळे सायंकाळनंतर आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली.
बालेवाडी येथील महानगरपालिकेच्या कै. बाबुराव बालवडकर शाळेची पटसंख्या चांगली आहे. परंतु मुलांना बसायला वर्ग कमी आहेत, पाणी वेळेवर व पुरेसे नाही. त्यामुळे स्वच्छतेचा अभाव, स्वच्छतागृहांची अपुरी संख्या, शिक्षक कमी आहेत. शिपाई कमी असल्यामुळे मुलांना शाळेची साफसफाई करावी लागते.
त्यामुळे बालेवाडी येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश बालवडकर यांनी याविषयी शिक्षण विभाग तसेच महापालिका आयुक्त यांना निवेदन दिले आहे ,परंतु काहीच सुविधा न मिळाल्याने गुरुवारी एक दिवसीय उपोषणाला सुरुवात केली. परंतु याचीही दखल कोणीच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी न घेतल्याने त्यांनी सायंकाळी पाचनंतर आमरण उपोषण सुरू केले असल्याचे सांगितले.
सदर शाळेमधील कर्मचारी व सेविका संख्या कमी होत्या, त्या वाढवण्यात आल्या आहेत. आणखी काही अडचणी असतील तर त्याही सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही औंध येथील साहायक प्रशासकीय अधिकारी सुरेश उचाळे यांनी दिली आहे.