अभियांत्रिकी विद्यार्थ्याचा इंद्रायणीत बुडून मृत्यू
#पुणे
राज्यभरात मंगळवारी धूलिवंदन सण आनंदात साजरा केला जात असताना पुण्यात मात्र एक दुःखद बातमी समोर आली आहे. रंग खेळून हात-पाय धुवायला नदीत गेलेल्या एका इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याचा इंद्रायणी नदीत बुडून मृत्यू झाला आहे. जयदीप पुरुषोत्तम पाटील असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो जळगाव येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.
आंबी येथील डॉ. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील आठ विद्यार्थी धूलिवंदन खेळले. त्यानंतर हे सर्वजण वराळे हद्दीतील इंद्रायणी नदीपात्रात हात-पाय धुण्यासाठी गेले होते. या दरम्यान जयदीपचा पाय घसरला आणि तो नदीपात्रात पडला. पाणी खोल असल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. या घटनेनंतर सोबतच्या तरुणांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये या घटनेची माहिती दिली. यानंतर दोन तासांच्या शोधमोहिमेनंतर जयदीपचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. बचाव पथकाने बोटीच्या साहाय्याने मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढला. या प्रकरणी अधिक तपास तळेगाव पोलीस करीत आहेत.
feedback@civicmirror.in