पत्नी, दोन मुलांचा खून करून डाॅक्टरची आत्महत्या
विजय चव्हाण
दौंड तालुक्यातील वरवंड येथे एका डॉक्टरने पत्नीचा गळा दाबून आणि दोन मुलांना विहिरीत ढकलून देत आत्महत्या केल्याची घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे.
या घटनेमुळे संपूर्ण दौंड तालुका हादरला आहे. डाॅक्टरने पत्नीच्या त्रासाला कंटाळून हे पाऊल उचलले असल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहे. वरवंड येथील गंगासागर पार्कमध्ये घर क्रमांक २०१ मध्ये ही घटना घडली.
डॉ. अतुल शिवाजी दिवेकर (वय ४२ ) आणि पत्नी पल्लवी (वय ३५) यांचे मृतदेह लटकलेल्या अवस्थेत घरी सापडले. मुलगा अद्वित (वय ११ ) आणि मुलगी वेदांतिका (वय ७ ) यांचे मृतदेह विहिरीत आढळले आहेत. विहीर सुमारे ६० फूट खोल असून ४५ फूट पाणी असल्याने मुलांचे मृतदेह वर काढण्यात मोठी अडचण येत आहे. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने त्यांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.
या घटनेने वरवंड परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अचानक घडलेल्या घटनेने वरवंड गावावर शोककळा पसरली आहे. डॉ. अतुल दिवेकर हे व्यवसायाने पशुवैद्यक असून त्यांची पत्नी ही एका शाळेत शिक्षिका असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांना घटनास्थळावरून सुसाईड नोट मिळाली असून पुढील तपास करण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. यामध्ये ‘‘मी पत्नीचा गळा आवळून आणि दोन मुलांना विहिरीत टाकून त्यांचा खून केला. मी स्वतः आत्महत्या करीत आहे,’’ असे या चिठ्ठीत नमूद करण्यात आले आहे.
याआधी रविवारी घडलेल्या एका घटनेत शुक्रवार पेठेतील चिंचेच्या तालमीजवळ असलेल्या एका सदनिकेत ज्येष्ठ दांपत्य मृतावस्थेत आढळले. होते. त्यांची दोन्ही मुले अमेरिकेत वास्तव्यास आहेत. निराशेतून त्यांनी ही टोकाचे पाऊल उचलले असावे, असे पोलिसांचे म्हणणे होते. त्यानंतर या घटनेत एकाच कुटुंबातील चौघांचा जीव गेल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.