रोहित्रातील तांब्याच्या तारा चोरणाऱ्यांना अटक
#पुणे
शेतीपंपांना वीज पुरवठा करणाऱ्या रोहित्रातील तांब्याच्या तारा चोरणाऱ्या टोळीला पुणे ग्रामीण पोलिसांच्या पथकाने अटक केली. या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने एका भंगार व्यावसायिकासह पाच जणांना अटक केली आहे. चोरट्यांनी भोर, पुरंदरसह जिल्ह्यातील ४२ विद्युत रोहित्रांची तोडफोड करून तांब्याच्या तारा चोरल्याची कबुली दिली आहे.
अब्दुल रेहमान खान (वय ३०), जावेद हदीस खान (वय ३१), सतराम रामदुलारे चौहान (२४) आणि शफीकअहमद अब्दुलरहीम खान (वय ३३, सर्व रा. उत्तरप्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुरंदर आणि भोर तालुका परिसरात शेतीपंपांना वीज पुरवठा करणाऱ्या महावितरणच्या रोहित्राची तोडफोड करून त्यातील तांब्याच्या तारा चोरीला जाण्याच्या घटना वाढीस लागल्या होत्या. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथक जिल्ह्यातील विविध भागात चोरट्यांचा शोध घेत होते.
तपासात माहितीनुसार भंगार माल खरेदी करणारा आरोपी अब्दुल खान याला ताब्यात घेण्यात आले. खान याचा आंबेगाव परिसरात भंगार व्यवसाय आहे. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने साथीदारांसह जिल्ह्याच्या विविध भागात रोहित्राची तोडफोड करून तांब्याच्या तारा चोरी केल्याचे उघडकीस आले. खानच्या चार साथीदारांना पोलिसांनी अटक केली. शिळीमकर, सहायक निरीक्षक राहुल गावडे, हवालदार सचिन घाडगे, दत्तात्रेय तांबे, विजय कांचन, मुकुंद कदम, अजित भुजबळ, धीरज जाधव, समाधान नाईकनवरे आणि अमोल शेडगे यांनी ही कारवाई केली.
feedback@civicmirror.in