मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर पुन्हा भीषण अपघात; चार मृत्यू
#उर्से टोलनाका
मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर गुरुवारी पुन्हा एकदा भीषण अपघात झाला आहे. उर्से टोलनाक्याजवळ झालेल्या या अपघातात चार प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. चालक धर्मेंद्रकुमार, अंकुशकुमार साकेत, माऊली बाबासाहेब कुंजीर, शियासन साकेत अशी चौघांची नावे आहेत. त्यांच्याकडील ओळख पत्रांवरून नावे समोर आली आहेत. मात्र, नातेवाईक आल्यानंतर मृतांच्या नावाबाबत खात्री केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले आहे .विशेष म्हणजे तीन आठवड्यापूर्वी १७ मार्च रोजी जसा अपघात झाला अगदी तसाच आणि त्याच परिसरात हा अपघात झाला आहे.
गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास ही चारचाकी मुंबईवरुन पुण्याला येत होती. तेव्हा एक अवजड वाहनाच्या चालकाने लघुशंकेसाठी गाडी महामार्गाच्या कडेला पार्क केली होती. त्याचवेळी मुंबईवरुन भरधाव वेगात आलेल्या चारचाकीच्या चालकाचा ताबा सुटला आणि गाडी थेट अवजड वाहनाला मागून धडकली. ही धडक इतकी भीषण होती की अक्षरशः निम्या गाडीचा चक्काचूर झाला.
दरम्यान १७ मार्च रोजी याच परिसरात असाच अपघात झाला होता, तेव्हा तीन प्रवाशांचा जीव गेला होता. त्यावेळी चारचाकी थेट ट्रकला धडकली होती. अख्खी गाडी ट्रक खाली गेल्याचे तेव्हा पाहायला मिळाले होते. मुंबईहून पुण्याच्या दिशेने ही कार जात होती, त्याचवेळी उर्से गावच्या परिसरात समोरच्या ट्रकला कारने मागून जोरदार धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती त्यातील चालक आणि दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला होता. अपघातात अर्धी कार ट्रकखाली गेली होती. या अपघाताच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजेच १८ मार्च रोजी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आणखी एक भीषण अपघात झाला होता. डिव्हाईडरचा अख्खा रॉड कारच्या बरोबर मधून आर-पार गेला होता. हा अपघात सकाळी साडे सातच्या सुमारास सोमाटणे फाट्यावर झाला होता. मुंबईवरुन सोमाटण्याकडे वळताना चालकाचा गाडीवरील ताबा सुटला अन् गाडी थेट अशा पद्धतीने डिव्हाईडरमध्ये घुसली. या कारमधून चालक आणि दोन प्रवासी महिला असे एकूण तीन जण प्रवास करत होते. सुदैवाने अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. देव तारी त्याला कोण मारी, अगदी त्याच्याच प्रत्यय या प्रसंगीही आला.
दरम्यान मुंबई आणि पुणे या दोन महत्वाच्या शहरांना जोडणारा हा मार्ग सुसाट गतीने धावतो. मात्र या मार्गावर अपघातांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात बघायला मिळते. अनेकदा मोठ-मोठ्या अपघातांमुळे या मार्गावर अनेकांना जीव गमवावा लागला आहे. अनेकांची कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत. मात्र तरीही योग्य सुविधा उपलब्ध झाल्या नाहीत. अपघाताचं सत्र कधी संपणार हा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून विचारला जात आहे.