कोयत्यांनंतर आता तलवार गँगची भीती
#कोंढवा
शहरातील कोयता गँगच्या दहशतीनंतर आता तलवार गँगने दहशत माजवली आहे. कोंढव्यातील टिळेकरनगर परिसरात आपली दहशत राहावी यासाठी १० ते १२ जणांच्या टोळक्याने १४ पेक्षा अधिक गाड्यांची तोडफोड केल्याचे समोर आले आहे. या घटनेने टिळेकरनगर परिसरातील नागरिक दहशतीखाली असल्याचे पाहायला मिळत आहे.
कोंढवा पोलिसांनी याबाबत अॅक्शन घेत या टोळीला ताब्यात घेतले आहे. बुधवारी रात्री ११ च्या सुमारास हा प्रकार घडला आहे. रिक्षा, दुचाकी, टेम्पो, चारचाकी अशा विविध गाड्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करण्यात आले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा दहशतीचे वातावरण निर्माण होऊ लागले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढवा परिसरातील टिळेकरनगर येथे काही तरुणांनी आरोपींना शिवीगाळ केल्याची माहिती समोर आली आहे. याच गोष्टीचा राग मनात धरून १० ते १२ जण चार चाकीमधून येथे आले. त्यांच्याजवळ असणाऱ्या हत्यारांनी त्यांनी परिसरात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने येथे उभ्या असलेल्या जवळपास १४ वाहनांची तोडफोड केली. यात ६ चारचाकी, ३ दुचाकी, ३ टेम्पो, १ रिक्षा यांचा समावेश आहे. या भागात आपले वर्चस्व टिकून राहावे म्हणून हा सगळा प्रकार घडल्याचे समोर येत आहे. पोलिसांनी ३ जणांना अटक केली असून बाकी गुन्हेगारांचा शोध सुरू आहे.
feedback@civicmirror.in