नियंत्रण सुटल्याने अपघात; दोघे जागीच गतप्राण
#दौंड
पुणे-सोलापूर महामार्गावरील स्वामी चिंचोली (ता. दौंड) ग्रामपंचायत हद्दीत चालकाचे चारचाकी गाडीवरील नियंत्रण सुटल्याने दोघांचा जागेवरच मृत्यू झाला आहे, तर तिघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी (ता. १२) दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली आहे. वैभव विठ्ठल जांभळे (वय २४, रा. तक्रारवाडी, ता. इंदापूर), प्रतीक पप्पू गवळी (वय २२, रा. मोशी, ता. हवेली) अशी अपघातात मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत.
या भीषण अपघातात आसिफ बशीर खान (वय २२, रा. भिगवण, ता. इंदापूर), सुरज राजू शेळके (वय २३ वर्ष, रा. भिगवण, ता. इंदापूर) व ऋषिकेश बाळासाहेब येळे (वय २२, रा. इंदापूर, ता. इंदापूर) अशी अपघातात जखमी झालेल्यांची नावे आहेत. जखमींवर भिगवण येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-सोलापूर महामार्गावरून सोलापूरच्या दिशेने हे पाचहीजण चारचाकी गाडीतून निघाले होते. दुपारी साडेबाराच्या सुमारास हॉटेल पंचरत्नजवळ येताच चालकाचे नियंत्रण सुटले आणि भरधाव जाणारी ही कार पलटली. दरम्यान, या अपघातात रस्त्यावरच या चारचाकी गाडीने ४ ते ५ पलट्या मारल्याची माहिती प्रत्यक्षदर्शी स्थानिकांनी दिली आहे. यावरून या कारचा वेग अमर्याद असल्याचा अंदाज येतो. या अपघातात दोघांचा जागेवरच मृत्यू झाला तर तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. रावणगाव पोलीस या अपघाताचा तपास करत आहेत. यातील वैभव हा व्यावसायिक असून तो टेलरकाम करीत होता. तर प्रतीक हा स्वामी चिंचोली येथील दत्तकला संस्थेत फार्मसीमध्ये शिकत होता. हा अपघात अतिवेगात असलेल्या स्विफ्ट कारवरील नियंत्रण सुटल्याने झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
feedback@civicmirror.in